साद - प्रतिसाद...!
काल बोलता बोलता हे म्हणाले.., "हल्ली तु सगळ्या गोष्टी कशा लवकर मान्य करतेस गं.. अजिबात वाद घालत नाही. आढेवेढे घेत नाही म्हणेल त्याला राजी असतेस."
या त्यांच्या वाक्यावर तेव्हा फक्त मी हसले. पण नंतर त्याचा विचार केल्यावर अनेक माझ्याच गोष्टी माझ्या समोर आल्या.
वयाच्या तिशी पर्यंत माणुस खुप जास्त हवेत असतो. वास्तविक परिस्थिती समजुन न घेता पत्त्यांचे बंगले रचत जातो. ते स्वप्न पुर्ण करण्यासाठी लागणारी ताकद माझ्या पंखात नाही... ही गोष्ट त्याच्या भाईच नसते. कुणी जर उत्तरेला चल म्हटलं, तर याला दक्षिणेलाच जायचं असतं. तेच संसारातही होतं..
नवऱ्याला ब्राऊन सोफा घ्यायचा असला, तर आपल्याला क्रिम कलर हवा असतो. नवरा म्हणतो घराची बाल्कनी बेडरुमला हवी... तर आपण म्हणतो, नाही बैठकीला हवी. नवरा म्हणतो महाराष्ट्रीयन जेवण जेवू, तेव्हा आपल्याला बिर्याणी खायची असते. एक जण बजेट बघतो... एकजण फक्त स्टाईल. वयाच्या तिशीत जोडीदाराला समजुन घेणं हे फार क्वचित होतं आणि आक्रमकता जास्त असते.
पण जसजसा काटा वर सरकायला लागतो... तसतशी आक्रमकता कमी व्हायला लागते. आणि कितीही आदळ आपट केली, तरी आहे त्या आजुबाजुच्या गोष्टी कधिच बदलणार नाहीत... हा वस्तुस्थितीचा स्विकार मन हळूहळू करते, नी शांततेच्या मार्गाने जायला लागते.
जेव्हा उत्तरेकडे ही तोच निसर्ग... नी दक्षिणेकडेही तोच निसर्ग हे जीवाला मान्य होतं, तेव्हा "किधर भी चलो... कोई बात नही" ही भावना मनात दृढ होत जाते.
आपल्याला मनःशांती हवी असेल तर "स्वीकार" हा तीन अक्षरी मंत्र फारच प्रभावीपणे काम करतो. आहे त्या माणसांचा, आहे त्या परिस्थितीचा,स्विकार तो ही आनंदाने.
आज माझ्या सोबत जे काही होतंय, ते चांगल्या साठीच होतंय, जिंदगी के सफर मे जे जे भेटतय ना... ते माझ्या चांगल्या साठीच भेटतायेत... असं मनावर पक्क कोरलंना... कि मग आपण आहेत्या परिस्थितीतही अत्यानंदात रहातो.
जीवनाकडुन काही अपेक्षाच नाही ठेवली ना... तर मग झाडाला आलेलं फुल पण निर्व्याज आनंद देऊन जातं. जगण्याची उर्जा देऊन जातं.
पण वाटतं तेवढ सोपं नाही बरंका हे.... स्वतः चा "मी" पणा बाजुला ठेवुन अवास्तव अपेक्षा बाजुला ठेवून चालत रहाणं... वाटतं तेवढं नक्कीच सोपं नाही.
