हे स्वतः करून पाहा...
भरपूर मित्र हवेत का? मग स्वतः मित्र व्हा आणि मैत्री निभावण्याचा कसोशीने प्रयत्न करा.
सर्व नातेसंबंधातील विश्वासार्हता जपा. त्याने स्वतःची व समाजाची जोपासना होते. विश्वासावरच जग चालतं, हे कायम लक्षात ठेवा.
लोक चूक करतात तेव्हा त्यांना क्षमा करायला शिका. नाती नष्ट होऊ देऊ नका. त्यांच्यात सुधारणा घडवून आणा, चूक आपल्याही हातून होऊ शकते, हे विसरू नका. एखाद्याच्या कृतीमुळे जर तुमचं काही नुकसान झालं असेल तर ते मुद्दामच केलं आहे असा पूर्वग्रह ठेवू नका.
मित्रमंडळीना आवर्जून घरी बोलवा. ते आपल्याकडे येतात तेव्हाच आपल्यात जवळीक आणि आपुलकीचा धागा निर्माण होतो. आपण त्यांना बोलावतो तेव्हा त्यातून आपली आपुलकी निर्माण करण्याची गरज व्यक्त होत असते..
ई-मेल्सद्वारे आलेले मेसेज, व्हाट्सएप वर आलेले मेसेज आणि फोन कॉल्सना न चुकता प्रतिसाद द्या. कुणाला ई-मेल केला किंवा रिप्लाय दिला नाही किंवा काहीच प्रतिसाद मिळाला नाही तर माणूस वैतागतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर त्यांना रिप्लाय देण्यानं माणसाला आपला निरोप तरी पोहोचल्याचा दिलासा मिळतो.
शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध ठेवा. ते कधी रस्त्यात भेटले तर हसून ओळख दाखवायला विसरू नका शेजाऱ्यांच्या आनंदाच्या व दुःखाच्या प्रसंगात त्यांना जरूर भेटा. त्यांना हवी ती मदत करा. मैत्री दीर्घकाळ कशी टिकेल याचा विचार करून वागा. जुने मित्र लांब जाण्यानं काळाच्या ओघात अंतर पडतं, पण संपर्क ठेवल्यास हे अंतर पुसताही येतं.
दुसऱ्याच्या दृष्टिकोनातूनही कधीतरी विचार करा इतरांची बाजूही पटेल. यामुळे तुमचा दृष्टिकोन व्यापक होईल व लोकंही तुमच्या बोलण्याचा विचार करतील
✍️वसुधा इंगळे
