Showing posts with label झेंडावंदन. Show all posts
Showing posts with label झेंडावंदन. Show all posts

Friday, October 10, 2025

टीटू – माझ्या सहाव्या महिन्याची सफर

टिटू - माझ्या सहाव्या महिन्याची सफर


गर्भारपणाचा सहावा महिना सुरू झाला आहे. मागचे पाच महिने अगदी सुंदर गेले. टीटूने फारसा त्रास दिला नाही, उलट जणू पोटात मस्त खेळत, हसत आणि माझ्याशी संवाद साधत दिवस घालवत होता. डॉक्टरांनी काही गोष्टी टाळायला सांगितल्या होत्या, काही काटेकोरपणे पाळायला सांगितल्या होत्या, आणि त्या मी पूर्ण मनापासून पाळत गेले.


 


या महिन्यात टीटूच्या गुलाबीसर त्वचेवर हलका थर आला आहे. छोट्या रोमकूपांची निर्मिती होत होती. केस फुटायला लागले होते. बुद्धीचा विकास वेगाने होत होता. म्हणूनच मी रोज गणिताची कोडी सोडवत होती, विज्ञानाचे प्रयोग बघत होती सामान्यज्ञान वाचायची. मला माहीत आहे – हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचतंय.

महान व्यक्तींचं जीवनचरित्र वाचताना, त्यांच्या मालिका बघताना मी टीटूशी बोलते. “हे बाळा, तुला हे ऐकायला मजा येतेय ना? तू बुद्धिमान, विचारशील आणि विवेकी होशील.” मनातून एक वेगळीच शक्ती मिळायची. रोज भगवंताला प्रार्थना करायची, की माझं बाळ तेजस्वी बुद्धीचं, शुद्ध मनाचं आणि धैर्यवान होवो. मी रोज सुवर्णजल प्राशन करायची, पौष्टिक आहार घेत होती – सगळं त्याच्यासाठीच.


एक दिवस आम्ही  संभाजी महाराजांचा चित्रपट बघायला गेलो होतो. पडद्यावर त्यांचा पराक्रम पाहताना माझ्या पोटात अचानक हालचाल झाली. टीटू एवढा आनंदात हलला की मला जाणवलं . त्याला महाराजांची गाथा किती आवडली आहे!

तेवढ्यात ठरवलं “आपण संभाजी महाराजांच्या समाधीला भेट द्यायला जायचंच.”


डॉक्टरांची परवानगी घेतली. आई- पप्पा आणि राणु ला मुंबईवरून बोलावलं. महाराजांच्या समाधी बरोबरच अजून काही ठिकाण फिरायच ठरवलं. ड्रायव्हरला सांगितलं प्रवास अगदी हळूहळू करायचा.


 *भीमा-कोरेगावचा विजयस्तंभ*


प्रवासाचा पहिला टप्पा होता भीमा-कोरेगाव. विजयस्तंभासमोर उभी राहिले, पोटावर हात ठेवला आणि टीटूला सांगितलं –




“ही लढाई १८१८ साली झाली. महार सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला. हा विजय त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून दरवर्षी १ जानेवारीला हजारो लोक इथे येऊन आपल्या पूर्वजांना अभिवादन करतात.”

मी आणि तुझे डॅडी पण आठ वर्षापूर्वी विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आलो होतो. 

मी बोलत असताना पोटातल्या छोट्याशा हालचालीने मला कळलं – टीटू माझं प्रत्येक शब्द ऐकत आहे. नंतर फोटो काढले आणि निघालो पुढच्या टप्प्याकडे.

 

वढू बुद्रुक आणि तुळापूर – समाधी


“टीटूराव, आता आपण वढू ला आलो आहोत. इथेच छत्रपती संभाजी महाराजांची खरी समाधी आहे.” मी पोटावर हात ठेवून हलकेच सांगितलं.




 

इतिहास आठवताच डोळ्यांत पाणी आलं. स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांचा तुळापूर येथे छळ करून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. औरंगजेबाच्या भीतीने कुणीही त्याच्या शरीराचे तुकडे उचलायला धजावलं नाही. पण गावकरी गणपत महार यांनी धाडस केलं. त्यांनी तुकडे शिवले आणि वढू बुद्रुक येथे अंत्यसंस्कार केले.




ही कहाणी सांगताना टीटू हलकेच हलला. माझ्या अंगातून शहारे आले. *जणू तोही त्या क्षणात सहभागी होत होता.*



आळंदीची प्रसन्नता


शेवटी पोहोचलो आळंदीला. तो दिवस एकादशीचा होता. संपूर्ण परिसरात भक्तिरस दाटून आला होता. आळंदी हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जात आणि इंद्रायणी नदीच्या काठी आहे. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाणारे ठिकाण आहे. आळंदी च दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी.

मनातल्या मनात प्रार्थना केली –“माझं लेकरू बुद्धिमान, एकाग्र आणि विवेकी होवो. त्याची बुद्धी तेजस्वी राहो.”


परतीच्या प्रवासातील शांतता


आळंदी च दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी. गाडी मध्ये सगळे झोपी गेले, पण आम्हाला काही झोप येत नव्हती कारण टीटू काही हालचालच करत नव्हता. फक्त महाराजांच्या समाधी च्या ठिकाणी आम्ही गेलो तेव्हाच आणि तिथेच टीटू फक्त हालचाल करत होता. त्या नंतर टीटू ने एकदम मौन च धारण केलं. इकडे मी फुल टेन्शन मध्ये....


कारण कधी कधी टीटू बद्दल फार कोणाला काही सांगितलं तर टीटू असाच शांत होतो. हे माहित होत मला...

अहो मला सारखं विचारत होते काय झाल काय झाल शांत का झालीस तू...

त्यांना हळू सांगितलं टीटू एकदम शांत आहे. ते मला म्हणाले त्याला अफ़र्मेशन देत रहा.

पण त्याला किती ही अफ़र्मेशन दिल्या तरी काही तो माझं ऐकत नव्हता.


शेवटी घरी आलो फ्रेश झालो, आणि डॅडा ने माझ्या पोटावर हाथ ठेवून समजावलं तेव्हा कुठे टीटू थोड फार हालचाल करायला लागला.. मग रात्री आम्ही जेवण झाल्यावर शतपावली करायला गच्ची वर गेलो; तेव्हा टीटू ला फार बरं वाटलं. कारण तेव्हा फक्त मम्मा डॅडी आणि टीटू होते ना. तेव्हा कुठे आमच्या दोघांच्या ही जीवात जीव आला. मग टीटू ला चांदण्या आणि विमान दाखवून आम्ही खाली आलो आणि शांत झोपलो.

 

२६ जानेवारी – सलामी


दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी. कॉलनी मध्ये, किंवा जवळपास शाळेमध्ये कुठे झेंडावंदन होत नव्हतं. मग ठरवलं – आपणच घरी राष्ट्रगीत गाऊया. आम्ही उभे राहिलो, राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली.


आणि काय आश्चर्य! पोटातल्या टीटूने सलामी दिल्यासारखी हालचाल केली. माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्या क्षणी राष्ट्रगीताची ताकद नव्याने जाणवली.


     सोनोग्राफीचा चमत्कार


दुपारी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर सोनोग्राफी करत होते. स्क्रीनवर टीटू दिसला – उजवा हात हृदयावर ठेवून निवांत झोपलेला. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते, पण हृदयाचा फोटो घेता येत नव्हता.


ते शेवटी हसून म्हणाले –

“तुम्हीच तुमच्या बाळाला समजवा, नाहीतर कठीण आहे तपासणी करणं!”

मग आम्ही रूम च्या बाहेर आलो; मी हळूच पोटावर हात ठेवून म्हणाले –

“बाळा, डॉक्टर आंटीला तुझा छान फोटो काढायचाय गं, थोडा हात बाजूला कर हा आता” अस सांगून आम्ही पुन्हा सोनोग्राफी रूम मध्ये गेलो. 


आणि खरंच! काही सेकंदांत टीटूने हात बाजूला घेतला. सोनोग्राफी पूर्ण झाली. डॉक्टर थक्क झाले.

“काय सांगितलं तुम्ही? हे बाळ तर अगदी समजूतदार आहे!”


मी फक्त हसले. कारण मला ठाऊक होतं – गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यापासून मी रोज त्याला प्रेमळ अफर्मेशन्स देत होते. रोज गप्पा मारते. म्हणूनच टीटू आज इतका समजूतदार आहे – अजून जन्मही घेतलेला नाही, आणि आधीच मनाने किती जवळचा वाटतो.

ही होती माझ्या सहाव्या महिन्याची गोष्ट –

माझ्या पोटातील छोट्याशा जीवाशी साधलेला संवाद, इतिहासाच्या वाटेवर केलेला प्रवास, आणि प्रेमळ शब्दांनी फुलवलेली नाळ.


✍🏻 वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...