Thursday, October 30, 2025

सातवा महिना : डोहाळे जेवण

 सातवा महिना: डोहाळ जेवण 


बघता बघता गरोदरपणाचा सातवा महिना लागला. खूप छान गेले हे सहा महिने. आम्ही बाळासोबत खूप आठवणी जमा केल्या. त्याची प्रत्येक प्रतिक्रिया मी माझ्या मनात साठवून ठेवली आहे. 


हळू हळू दिवस सरत होते, तस तस माझं पोट सुद्धा दिसायला लागलं. आणि टीटू ची हालचाल सुद्धा खूप वेगाने होत होती. कधी कधी तर त्याला पोटात इतकी मस्ती करावीशी वाटत असेल की माझी रात्री ची झोपच उडायची. 


एक दिवस टीटू शी गप्पा मारताना विचारलं मी, टीटू डॅडी चा वाढदिवस जवळ येत आहे. आपण त्यांना काय बर गिफ्ट द्यायचं. मग म्हटलं टीटू तर लहान आहे तो कसा सांगणार मला.

मग मी त्याला काही पर्याय दिले...आणि ज्या पर्याय ला टीटू हालचाल करेल किंवा लाथ मारेल आपण तेच गिफ्ट घ्यायचे. मग ठरलं असच करायचं, आणि टीटू ने हलकेच होकार दिला.





वाढदिवसाचा दिवस आला, छान गोड जेवण बनवल दुपारी. जेवण करून आराम झालं. संध्याकाळी मस्त दोघ तयार झालो. टीटू सोबत डॅडी चा पहिला वाढदिवस साजरा होणार होता. भगवंतांन समोर नतमस्तक झालो, आणि त्रिसरणं पंचशील ग्रहण करतं असताना; पुन्हा टीटू जणू पोटात खूप जोरात हालचाल करू लागला. जणू काही मी पण आहे तुमच्या सोबत. इतकं छान वाटलं ना, जणू अंगावरून मोरपिस फिरवाव तस.




वाढदिवस साजरा झाला, केक कापला, फोटो काढले, बाहेर जेवायला गेलो. आणि टीटू च्या छान छान प्रतिसादामुळे तर आणखीनच छान जातो दिवस. 


सातवा महिना लागला होतो, तर मग डोहाळे जेवण करायचं.

कस करायचं, काय काय करायचं, कपडे काय घालायचे, डेकोरेशन कस असेल, आमंत्रण करायची, सगळ्या सगळ्या गोष्टीची उत्साहात घाई सुरू झाली.


आणि मग आला तो दिवस, घरात पाहुणे जमले...घर अगदी भरून गेले. खूप आनंदा च वातावरण झालं होतं. मज्जा मस्ती, कोणाची गंमत तर कोणाची खोड काढणं अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या. कारण आमच्या आयुष्यातला लग्नानंतर चा पहिला क्षण होता. ज्या दिवसाची आम्ही खूप वर्ष वाट पाहिली होती.


आई होणं ही एक विलक्षण भावना आहे – नव्या जीवनाची चाहूल आणि एका स्त्रीच्या आयुष्यातील नवं पर्व. माझ्यासाठी या सुंदर प्रवासातला सर्वात खास दिवस म्हणजे माझं डोहाळे जेवण.




त्या दिवशीचा उत्साह अजूनही मनात तसाच ताजातवाना आहे. हिरवी साडी नेसलेली, हिरवा चुडा घातलेला, चेहऱ्यावर आनंदाचा प्रकाश – मी अक्षरशः तेजस्वी दिसत होते. त्या दिवसाची तयारी काही साधी नव्हती, कारण ही केवळ एक परंपरा नव्हती, तर माझ्या मातृत्वाच्या सुरुवातीची गोड साक्ष होती.




सगळ्यांना अजून आठवतंय – “झिंगाट” गाण्यावर माझा आणि नरेनचा एकदम धम्माल डान्स! लग्नातसुद्धा इतकी धमाल केली नव्हती, जितकी डोहाळे जेवणाला केली. आम्ही नुसतं नाचलो नाही, तर त्या क्षणाला जिवंत केलं. सगळे पाहुणे हसत होते, टाळ्या वाजवत होते – आणि आम्ही त्या आनंदात न्हालो होतो.





मग आला माझा खास उखाणा –


"रायगड किल्याचे पहिले नाव होते रायरी,


अहोन सोबत सुरू करते संसाराची पहिली पायरी,


आमच्या आनंदावर नाही राहिला ताबा,


सप्टेंबरमध्ये समजले मी होणार आई आणि हे होणार बाबा."




हा उखाणा घेताना माझ्या बाळाने पोटात मस्ती केली – आणि मी अर्धा उखाणा विसरले! पण त्या हास्यातच सगळं काही होतं – माझं आई होणं, नरेनचं बाबा होणं, आणि त्या छोट्याशा जीवाचं आमच्या आयुष्यात येणं.


"आता पर्यंत च्या प्रेमात यांनी पडू दिली नाही कसली कमी, काय माहित कोण येणार – थोर भीमबा की आमची रमाई!"


सगळ्यांना इतका मजेशीर वाटला हा उखाणा की टाळ्यांचा वर्षाव झाला. शेवटी हसत-हसत विचारलं – 


"नरेन राव सांगा आता काय उचलू – बर्फी की पेढा?"



उखाणा तर सगळ्यांना आवडला पण सगळ्यांच्या आग्रहाखातर यांना पण उखाणा घ्यावा लागला.

आधी मला म्हणाले होते मी नाही घेणार. पण मी म्हटलं लक्षात तर ठेवा फक्त, घ्यायचं की नाही नंतर ठरवू.


मग घेतला एकदाचा उखाणा, 

"नात्याच्या सृष्टीला प्रेमाचा गाभा,

वसुधा होईल आई आणि मी होणार बाबा".


त्या दिवसातला प्रत्येक क्षण माझ्यासाठी अमूल्य आहे – डान्स, उखाणे, मस्ती, आणि बाळाची चाहूल... सगळं एकत्र मिळून बनलं आहे माझ्या जीवनातलं एक सोन्यासारखं पान.



✍🏻वसुधा इंगळे.





Friday, October 10, 2025

टीटू – माझ्या सहाव्या महिन्याची सफर

टिटू - माझ्या सहाव्या महिन्याची सफर


गर्भारपणाचा सहावा महिना सुरू झाला आहे. मागचे पाच महिने अगदी सुंदर गेले. टीटूने फारसा त्रास दिला नाही, उलट जणू पोटात मस्त खेळत, हसत आणि माझ्याशी संवाद साधत दिवस घालवत होता. डॉक्टरांनी काही गोष्टी टाळायला सांगितल्या होत्या, काही काटेकोरपणे पाळायला सांगितल्या होत्या, आणि त्या मी पूर्ण मनापासून पाळत गेले.


 


या महिन्यात टीटूच्या गुलाबीसर त्वचेवर हलका थर आला आहे. छोट्या रोमकूपांची निर्मिती होत होती. केस फुटायला लागले होते. बुद्धीचा विकास वेगाने होत होता. म्हणूनच मी रोज गणिताची कोडी सोडवत होती, विज्ञानाचे प्रयोग बघत होती सामान्यज्ञान वाचायची. मला माहीत आहे – हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचतंय.

महान व्यक्तींचं जीवनचरित्र वाचताना, त्यांच्या मालिका बघताना मी टीटूशी बोलते. “हे बाळा, तुला हे ऐकायला मजा येतेय ना? तू बुद्धिमान, विचारशील आणि विवेकी होशील.” मनातून एक वेगळीच शक्ती मिळायची. रोज भगवंताला प्रार्थना करायची, की माझं बाळ तेजस्वी बुद्धीचं, शुद्ध मनाचं आणि धैर्यवान होवो. मी रोज सुवर्णजल प्राशन करायची, पौष्टिक आहार घेत होती – सगळं त्याच्यासाठीच.


एक दिवस आम्ही  संभाजी महाराजांचा चित्रपट बघायला गेलो होतो. पडद्यावर त्यांचा पराक्रम पाहताना माझ्या पोटात अचानक हालचाल झाली. टीटू एवढा आनंदात हलला की मला जाणवलं . त्याला महाराजांची गाथा किती आवडली आहे!

तेवढ्यात ठरवलं “आपण संभाजी महाराजांच्या समाधीला भेट द्यायला जायचंच.”


डॉक्टरांची परवानगी घेतली. आई- पप्पा आणि राणु ला मुंबईवरून बोलावलं. महाराजांच्या समाधी बरोबरच अजून काही ठिकाण फिरायच ठरवलं. ड्रायव्हरला सांगितलं प्रवास अगदी हळूहळू करायचा.


 *भीमा-कोरेगावचा विजयस्तंभ*


प्रवासाचा पहिला टप्पा होता भीमा-कोरेगाव. विजयस्तंभासमोर उभी राहिले, पोटावर हात ठेवला आणि टीटूला सांगितलं –




“ही लढाई १८१८ साली झाली. महार सैनिकांनी ब्रिटिशांच्या बाजूने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला. हा विजय त्यांच्या शौर्याचं प्रतीक आहे. म्हणून दरवर्षी १ जानेवारीला हजारो लोक इथे येऊन आपल्या पूर्वजांना अभिवादन करतात.”

मी आणि तुझे डॅडी पण आठ वर्षापूर्वी विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी आलो होतो. 

मी बोलत असताना पोटातल्या छोट्याशा हालचालीने मला कळलं – टीटू माझं प्रत्येक शब्द ऐकत आहे. नंतर फोटो काढले आणि निघालो पुढच्या टप्प्याकडे.

 

वढू बुद्रुक आणि तुळापूर – समाधी


“टीटूराव, आता आपण वढू ला आलो आहोत. इथेच छत्रपती संभाजी महाराजांची खरी समाधी आहे.” मी पोटावर हात ठेवून हलकेच सांगितलं.




 

इतिहास आठवताच डोळ्यांत पाणी आलं. स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराज यांचा तुळापूर येथे छळ करून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला. औरंगजेबाच्या भीतीने कुणीही त्याच्या शरीराचे तुकडे उचलायला धजावलं नाही. पण गावकरी गणपत महार यांनी धाडस केलं. त्यांनी तुकडे शिवले आणि वढू बुद्रुक येथे अंत्यसंस्कार केले.




ही कहाणी सांगताना टीटू हलकेच हलला. माझ्या अंगातून शहारे आले. *जणू तोही त्या क्षणात सहभागी होत होता.*



आळंदीची प्रसन्नता


शेवटी पोहोचलो आळंदीला. तो दिवस एकादशीचा होता. संपूर्ण परिसरात भक्तिरस दाटून आला होता. आळंदी हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे, जे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ म्हणून ओळखले जात आणि इंद्रायणी नदीच्या काठी आहे. वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र मानले जाणारे ठिकाण आहे. आळंदी च दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी.

मनातल्या मनात प्रार्थना केली –“माझं लेकरू बुद्धिमान, एकाग्र आणि विवेकी होवो. त्याची बुद्धी तेजस्वी राहो.”


परतीच्या प्रवासातील शांतता


आळंदी च दर्शन घेऊन आम्ही निघालो घराकडे जाण्यासाठी. गाडी मध्ये सगळे झोपी गेले, पण आम्हाला काही झोप येत नव्हती कारण टीटू काही हालचालच करत नव्हता. फक्त महाराजांच्या समाधी च्या ठिकाणी आम्ही गेलो तेव्हाच आणि तिथेच टीटू फक्त हालचाल करत होता. त्या नंतर टीटू ने एकदम मौन च धारण केलं. इकडे मी फुल टेन्शन मध्ये....


कारण कधी कधी टीटू बद्दल फार कोणाला काही सांगितलं तर टीटू असाच शांत होतो. हे माहित होत मला...

अहो मला सारखं विचारत होते काय झाल काय झाल शांत का झालीस तू...

त्यांना हळू सांगितलं टीटू एकदम शांत आहे. ते मला म्हणाले त्याला अफ़र्मेशन देत रहा.

पण त्याला किती ही अफ़र्मेशन दिल्या तरी काही तो माझं ऐकत नव्हता.


शेवटी घरी आलो फ्रेश झालो, आणि डॅडा ने माझ्या पोटावर हाथ ठेवून समजावलं तेव्हा कुठे टीटू थोड फार हालचाल करायला लागला.. मग रात्री आम्ही जेवण झाल्यावर शतपावली करायला गच्ची वर गेलो; तेव्हा टीटू ला फार बरं वाटलं. कारण तेव्हा फक्त मम्मा डॅडी आणि टीटू होते ना. तेव्हा कुठे आमच्या दोघांच्या ही जीवात जीव आला. मग टीटू ला चांदण्या आणि विमान दाखवून आम्ही खाली आलो आणि शांत झोपलो.

 

२६ जानेवारी – सलामी


दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी. कॉलनी मध्ये, किंवा जवळपास शाळेमध्ये कुठे झेंडावंदन होत नव्हतं. मग ठरवलं – आपणच घरी राष्ट्रगीत गाऊया. आम्ही उभे राहिलो, राष्ट्रगीत म्हणायला सुरुवात केली.


आणि काय आश्चर्य! पोटातल्या टीटूने सलामी दिल्यासारखी हालचाल केली. माझ्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्या क्षणी राष्ट्रगीताची ताकद नव्याने जाणवली.


     सोनोग्राफीचा चमत्कार


दुपारी हॉस्पिटलला गेलो. डॉक्टर सोनोग्राफी करत होते. स्क्रीनवर टीटू दिसला – उजवा हात हृदयावर ठेवून निवांत झोपलेला. डॉक्टर त्यांचे प्रयत्न करत होते, पण हृदयाचा फोटो घेता येत नव्हता.


ते शेवटी हसून म्हणाले –

“तुम्हीच तुमच्या बाळाला समजवा, नाहीतर कठीण आहे तपासणी करणं!”

मग आम्ही रूम च्या बाहेर आलो; मी हळूच पोटावर हात ठेवून म्हणाले –

“बाळा, डॉक्टर आंटीला तुझा छान फोटो काढायचाय गं, थोडा हात बाजूला कर हा आता” अस सांगून आम्ही पुन्हा सोनोग्राफी रूम मध्ये गेलो. 


आणि खरंच! काही सेकंदांत टीटूने हात बाजूला घेतला. सोनोग्राफी पूर्ण झाली. डॉक्टर थक्क झाले.

“काय सांगितलं तुम्ही? हे बाळ तर अगदी समजूतदार आहे!”


मी फक्त हसले. कारण मला ठाऊक होतं – गर्भधारणेच्या सातव्या आठवड्यापासून मी रोज त्याला प्रेमळ अफर्मेशन्स देत होते. रोज गप्पा मारते. म्हणूनच टीटू आज इतका समजूतदार आहे – अजून जन्मही घेतलेला नाही, आणि आधीच मनाने किती जवळचा वाटतो.

ही होती माझ्या सहाव्या महिन्याची गोष्ट –

माझ्या पोटातील छोट्याशा जीवाशी साधलेला संवाद, इतिहासाच्या वाटेवर केलेला प्रवास, आणि प्रेमळ शब्दांनी फुलवलेली नाळ.


✍🏻 वसुधा इंगळे.

Saturday, October 4, 2025

आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली


आई: बाळासाठी झगडणारी, स्वतःशी हरलेली

मागच्या काही दिवसांतली एक धक्कादायक बातमी आपण सगळ्यांनीच ऐकली—एका आईने आपल्या १५ दिवसांच्या बाळाला रडत होतं म्हणून थेट फ्रिजमध्ये ठेवलं. देवाची कृपा म्हणून बाळ वाचलं. सुरुवातीला हे ऐकलं तेव्हा मन सुन्न झालं, पण नंतर जेव्हा समजलं की ती स्त्री *पोस्टपार्टम सायकॉसिस* या मानसिक आजाराशी झुंज देत होती, तेव्हा मनात अनेक प्रश्न उभे राहिले.



आजचा हा ब्लॉग माझ्यासाठी वेगळा आहे. वेगळा, कारण हा लेख माझ्या मैत्रिणीच्या आग्रहाने लिहितेय. अनुभव तिचा आहे, शब्दरचना माझी.


बाळ जन्मल्यानंतरचा काळ आईसाठी कसोटीचा असतो. बाळासाठी प्रेम, काळजी, माया या सगळ्यांची उधळण होते, पण बाळाच्या आईकडे लक्ष देण्याचं आपल्या समाजाला जणू विस्मरणच झालेलं असतं. गर्भावस्थेत जितकी आईची काळजी घेतली जाते, तितकीच प्रसूतीनंतर तिला बाजूला सारलं जातं.


आईचं शरीर शारीरिकदृष्ट्या नाजूक असतंच, पण तिचं मन अधिक अस्थिर असतं. हार्मोन्स, थकवा, झोपेची कमतरता आणि सततची जबाबदारी—या सगळ्यामुळे ती तुटत चाललेली असते. पण तिचं ऐकून घेण्याऐवजी तिलाच दोष दिला जातो.


“आम्ही नाही का लेकरं केली? तुम्हालाच लेकरं झाली का?”

“बाळ आजारी आहे म्हणजे आईकडून काहीतरी चुकलं असेल.”

“बाळ बारिक दिसतंय, म्हणजे आईनं नीट काळजी घेतली नाही.”

“तू जाड झालीस, चेहऱ्यावर बदल दिसतोय.”


अशा टोमण्यांनी तिचं मन आणखी खचवलं जातं. तिची चिडचिड झाली तरी तिच्यावरच ओरडल जात. तिच्या मानसिक आरोग्याची काळजी मात्र कुणीच घेत नाही—कधी माहेरचेही तिला समजून घेत नाहीत. तिला सगळ्यात जास्त अपेक्षा माहेरून असते; कारण ते आपले जिव्हाळ्याचे, आपुलकीचे असतात.


पण हेच खरं आहे की, अशा अवस्थेतही आई तग धरून राहते—फक्त आपल्या बाळासाठी. बाळ तिच्यासाठी पूर्ण विश्व बनतं. ती झगडते, रडते, खचते, पण शेवटी उभी राहते. आणि जसजसा काळ पुढे सरकतो तसतशी ती कणखर होत जाते—इतकी कणखर की नंतर तिला कुठल्याही टीकेचा फरक पडत नाही.


पण एक गोष्ट ती कायम लक्षात ठेवते—त्या कठीण काळात कुणी तिची साथ दिली आणि कुणी जखम केली. हाच अनुभव तिच्या पुढच्या आयुष्याचा पाया ठरतो.


*तुम्ही आईला कशी मदत करू शकता?*


* आईला दोष देण्याऐवजी तिचं ऐका आणि समजून घ्या.

* तिच्या थकव्याला, निराशेला कमी लेखू नका. तिला बोलू द्या.

* बाळाची जबाबदारी वाटून घ्या—झोपवणं, पाजणं, डायपर बदलणं.

* तिच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीबद्दल काळजीपूर्वक लक्ष ठेवा.

* कुठलीही समस्या जास्त गंभीर वाटली तर तिला तज्ज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जा.

* “तू आई झालीस म्हणजे आता सगळं तुझ्यावर” अशी अपेक्षा ठेवू नका. तिच्यासाठीही ती *नवीन भूमिका* आहे.


आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नव्हे; तर त्या काळातल्या तिच्या मानसिक प्रवासाला समजून घेणं आणि तिला जपणं हे समाजाचंही कर्तव्य आहे. कारण, बाळाला सांभाळणारी आई जर मानसिकदृष्ट्या स्वस्थ नसेल, तर बाळाचं आयुष्यही खऱ्या अर्थानं सुरक्षित राहू शकत नाही.


✨ **प्रेरणादायी शेवट**

आई म्हणजे फक्त जीव देणारी नाही, तर जीवाला उभारी देणारी ताकद आहे. तिच्या मनाला थोडं समजून घेतलं, तिच्यावर थोडं प्रेम ओतलं, तर ती स्वतःलाही आणि बाळालाही नव्या जगाला सामोरं जाण्याची खरी शक्ती देते. 🌸



*“बाळाचं रडणं सगळ्यांना ऐकू येतं, पण आईच्या मनाचं रडणं क्वचित कुणाला जाणवतं.”*


✍🏻वसुधा इंगळे.

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...