आता मला जमायला लागलंय!
आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर
जे जे मला दुखवत गेले, त्या त्या सगळ्यांना न दुखावता सोडून देणं,
आता मला जमायला लागलयं!
संघर्षाच्या किंवा वादविवादाच्या क्षणी, वाद न घालता तेथून दूर
निघून जाण्यातच खरी परिपक्वता असते हे ही समजायला लागलय!
माझ्या बरोबर घडणाऱ्या अनेक वाईट गोष्टींचा उहापोह करून, त्यात शक्ती खर्ची घालून,
आजूबाजूला जे जे उत्तम आहे, त्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून जातोय
हे ही जाणवायला लागलयं!
आलेल्या अनुभवांतून बाहेर पडत
स्वतःला सावरून, इतरांना आनंदी करणे मला आता जमायला लागलंय!
कोणत्याही न पटणाऱ्या गोष्टींवर
काहीही न बोलणे म्हणजे त्यांना संमती असणे गरजेचे नाही!
कधी-कधी काहीही न बोलणं
किंवा कोणतही प्रत्युत्तर न देणं
खूप काही बोलून जातं,
आणि सांगूनही जातं!
हे ही कळायला लागलंय!
आपण लोकांवर किंवा त्यांच्या विचारांवर बंधनं आणू शकत नाही,
पण स्वतः च्या मनावर मात्र
बांध घालू शकतो.
आपण अशा लोकांचे वागणे
किती मनावर घ्यायचे, त्यांना किती महत्व द्यायचं, त्यांनी बोललेल्या गोष्टी किती डोक्यात साठवायच्या
आणि स्वतःचे आयुष्य खराब करून घ्यायचं कां?
हे ठरवणं गरजेचं असतं
हे ही कळायला लागलयं!
कधी कधी परिस्थितीला
आहे तसच सोडून देणं,
आणि शांत राहणं सोईच ठरतं!
लोकांना कुठल्याही गोष्टीचं
स्पष्टीकरण देत बसणं आणि त्यांनी तुम्हाला समजून घेण्याची अपेक्षा करणं बावळटपणाचं आहे हे कळल्यावर मी आता मला,
त्या दृष्टीने घडवायला लागलोय!
मी इतके दिवस ज्याचा प्रकर्षाने शोध घेत होतो ती मन:शांती, समाधान मला मिळालं तेव्हा ठरवलं की,मी अशा लोकांपासून
लांब राहावे. ज्यांच्या दृष्टीने मी चांगला नाही अन् मला स्वतःला
त्यांच्या साच्यात बसवणं शक्य नाही त्यांच्यापासून अंतर ठेवणं
आता मला जमायला लागलयं!
सतत वादविवाद वा भावना नसलेले संबंध मनाला त्रास देतात.
तोंडावर गोड बोलून मागे वाईट वागणाऱ्या, वरवर संबंध ठेवणाऱ्या लोकांना आता मी कटाक्षाने दूर ठेवायला हवं हे पटायला लागलयं!
माझ्या स्वतःच्या आनंदाचा ठेवा मला सापडलायं, आणि उशीरा कां होईना पण मी आता त्या वाटेवर
समाधानानं पावलं टाकायला लागलोय!
त्या वाटेवर स्थिर राहणं,
आता मला जमायला लागलंय!🌹🌿🌾
No comments:
Post a Comment