Saturday, January 21, 2023

स्त्री

स्त्री



स्त्री ही विलोभनीय तितकीच विलक्षण गुढ असते. तिच्यामध्ये नकळत एक अबोली दडलेली असते. रुसण्याचा हक्क जोवर ती अबाधित ठेवते. तेव्हा ती खऱ्या अर्थाने तुमची असते .

पण नकळत मौनामध्ये संवादांच्या उत्कट बिंदूंच्या शब्दांच्या पलीकडे जेव्हा  ती  स्थिरावते . तेव्हा ती नकळत तिच्या अंतरमना ची दाहकता असू शकते.

 अशा अबोलीला पुन्हा मोगऱ्याच्या सुगंधात लय लूट करून नव्याने फुलून दरवळून येणे जमेलच हे सांगणे तितकेसे कठीण....


       

Tuesday, January 17, 2023

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे


आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं.  



 वेळ थोडाच आहे 

आता सावरायला हवं ,

काहीतरी निसटून चाललं आहे

ते थांबायलाच हवं 

पुढे तर खूप आलो 

आता थोडं मागे वळून पहायला हवं 

आपलं काही चुकत तर नाही ना?

 हे आता बघायला  हवं

 मी ,माझं न करता "आपले" पण जपायला हवं

आयुष्य खरंच खूप सुंदर आहे ते अजून सुंदर बनवायला हवं.


✍️ वसुधा इंगळे

Thursday, January 12, 2023

मित्र

मित्रांचे कट्टे आजकाल ओसच पडतात.

कुणी ‘whatsapp’ वर तर कुणी ‘Facebook वर जमतात.

प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळ्यात पडतात.


कारण सगळे विषय ‘Chat’ वरच संपलेले असतात.

मग ‘Chat’ वर भेटूच याचं ‘Promise’ होतं.

आणि संभाषणातून ‘Sign out’ केलं जातं.


‘लाल’ ‘हिरव्या’ दिव्यांच्या गर्दीत मग हरवायला होतं.

घट्ट पकडलेल्या हातानांही सैल सुटायला होतं.


‘Available' आणि ‘Busy’ मध्ये

प्रत्येकाचा ‘Status’ घुटमळत राहतो.

आपणहून ‘Add’ केलेल्या मित्रापासून

लपण्याकरिता ‘Invisible’चा आडोसा घेतला जातो. ताप आल्याचं आजकाल आईच्या

आधी ‘Facebook’ला कळतं.

औषधापेक्षा ‘Take care’च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं. 


मनातलं सगळं Facebook वर ओकायची मैत्रीत गरजच का असावी?

नात्यांना धरून ठेवायला

‘Net’ ची जाळीच का असावी?


कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं.

‘Chat’ला गप्पांनी आणि ‘Smile’  ला

हास्यांनी ‘Replace’ करावं.


शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं. मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं.


चला तर पूर्वीचे दिवस

पुन्हा अनुभवूया.

मैत्रीला ‘Technology'

पासून जपून ठेवूया.


✍️वसुधा इंगळे

चेटला रामय्या

 एकट्याने तब्बल एक कोटी झाडे लावणाऱ्या या अत्यंत साध्या माणसाची कहाणी..  


नसानसात निसर्ग प्रेम,अत्यंत साधा माणूस ..या अवलीयाचं नाव आहे दरीपल्ली रामय्या. तेलंगणा राज्यातल्या ‘खंमम’ जिल्ह्यातला हा रहिवासी. फक्त त्याच्याच गावातल्या लोकांना त्याची ही करामत माहिती आहे. म्हणून काही लोक त्याला ‘चेटला रामय्या’ असे संबोधतात..  अत्यंत साधा माणूस. सायकलवर फेरी मारायची, त्यामुळे कसलाही खर्च नाही. बिया देण्याचं काम झाडेच करतात. 


फक्त साठवायच्या आणि वेळ मिळाला की पेरून यायच्या. हे मोठ्ठ काम ह्या व्यक्तीने हाती घेतलं पण कुठेही बोभाटा न करता.गावातल्या काही लोकांना ह्या माणसाच्या वेड्या छंदाची माहिती होती. काही लोक वेडा माणूस म्हणायचे  रामय्याने खंमम जिल्ह्यातील एक कॅनॉल निवडला. चार किलोमीटरच्या परिसरात कॅनॉलच्या दोन्ही बाजूने अनेक वृक्षांची उभारणी केली.रामय्या नुसती झाडे लावून थांबत नाही तर, त्या झाडांची वाढ होईपर्यंत त्यांची काळजी स्वतः सायकलवर फिरून घेतो. एखाद्या लहान मुलाला वाढवावं तसं त्या रोपांना वाढवतो. मोठी झालेली झाडं काही दिवसांत मोठे वृक्षही होतील.कोण कोणत्या प्रकारचे आहेत हे वृक्ष? रामय्यांनी लावलेल्या झाडांत असंख्य प्रकारचे वृक्ष आहेत. 


बेल , पिंपळ, कदंब, कडूनिंब, चंदन, रक्त चंदन असे मोठे मोठे वृक्ष रामय्याने लावलेत. त्याचे गाव सगळीकडे हिरवे गार झाले आहे, तेही त्याच्या एकट्याच्या ध्यासातून. सरकारी जमिनीत रक्तचंदनाची झाडे लावून ती मोठी झाल्यावर सरकारतर्फेच लिलावाच्या पद्धतीने विका. म्हणजे तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. ही रामय्यांची सूचना सरकारने मान्य देखील केली.


रामय्याची आपल्या कामावर निष्ठा आहे. त्यांनी केलेल्या कामाचे फळ आता सगळीकडून त्यांना मिळायला लागले आहे. लोक आता त्यांच्या कामाची वाहवा करायला लागले आहेत. त्यांना आपोआपच नावलौकिक मिळायला लागला आहे.  काही राज्यस्तरीय सरकारी पुरस्कारांसोबत त्यांना २०१७ साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार ही मिळाला आहे.


प्रसिद्धीची आस नसलेल्या, धनाची लालसा नसलेल्या, पण निसर्गाची समृद्धी सतत वाढत राहो या उत्कट इच्छेने काम करणाऱ्या या अवलीयाला शतशः प्रणाम..!  

✍️वसुधा इंगळे

आयुष्य आनंदाने जगू या.

 *आयुष्य आनंदाने जगू या.....।*


*ज्याच्या जवळ सर्व असतं त्याला त्याची किंमत कळत नसते, हेच खरं , आयुष्यातील प्रत्येक  सीन वन टेक, परत तो सीन नाही  म्हणुन  तर जीवन जगतांना Must Be positive , Must Be happy & satisfied...!!!


*कुणी एक विधवा साश्रूनयनांनी सांगत होती ... , "नेहमी भांडायचे मी...  माहेरी जाईन... घटस्फोट देईन.... इतक्या थरापर्यंत आमची भांडण जायची, पण आता काय ....!!!!


*नाती, माणसं... जिवंत असतात तोवर किती निष्काळजी आणि बेफिकीर असतो नं आपण? जेव्हा परतायच्या वाटाच बंद होतात, तेव्हा कळते त्यांची किंमत. पण तोवर काळानं पान उलटलेलं असतं आणि ... आणि आपल्या हातात फक्त आठवणींच्या जखमांचं दान असतं...!


*म्हणूनच, या जन्माचा प्रत्येक क्षण आसुसून जगायला हवा....! पूर्णविरामाचा क्षण, कुणास ठाऊक कधी समोर राहील उभा... भूतकाळ माझा नाही. भविष्यावर अधिकार नाही. पण वर्तमानातला प्रत्येक क्षण फक्त माझ्यासाठीच आहे. म्हणून तर वर्तमानाला इंग्लिशमध्ये प्रेझेंट म्हणतात. हे प्रेझेंट, हे बक्षीस, आपण सर्वार्थानं उपभोगायला हवं. सजगतेनं जगायला हवं.


*एकत्र कुटुंबात राहणाऱ्याला घरं तोडून स्वतंत्र व्हायचे डोहाळे लागले की, वाईट वाटतं. आपला सगळा राग मुलांवर काढणारे पालक दिसले की, विचारावंसं वाटतं, मुलं नसण्याचं दु:ख पदरी नाही, याचा आनंद मानायचा सोडून, असलेल्या सुखावर हात कसा उगारता तुम्ही..?


*अरसिक नवरा किंवा बायको पाहिले की त्यांना लग्नासाठी झुरणारी मंडळी दाखवावीशी वाटतात...!! आई-वडिलांना दुखावणाऱ्यांना अनाथालयात न्यावंसं वाटतं. सतत रडवेला मुखडा घेऊन जगणाऱ्यांना हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला पाठवावंसं वाटतं.


*जगण्याचा कंटाळा आलाय असं म्हणत, इतरांना कंटाळा आणणाऱ्यांना कॅन्सरशी झुंजणाऱ्या पेशंटना भेटवावसं वाटतं. श्रीमंतांच्या श्रीमंतीचा हेवा करत कुढणाऱ्यांना, इस्टेटीच्या वादावरून झालेला रक्तरंजित इतिहास वाचून दाखवावासा वाटतो.


*अपूर्ण इच्छांच्या पूर्ततेची हमी दशक्रिया विधीच्या वेळी देऊन पिंडाला कावळा शिवावा म्हणून प्रार्थना करण्यापेक्षा ती व्यक्ती जिवंत असतानाच तो आपलेपणा आणि विश्वास दाखवला गेला असता तर ...?


*आपण काय चुकतो ते न पाहता दुसऱ्याला दोष देणारे कधीच समाधानी असू शकत नाहीत. अपेक्षा वास्तव व योग्य असल्या तर एकमेकांच्या विचाराने पूर्ण करता येतात. जीवन समाधानाने जगणे हे पैशापेक्षाही महत्वाचे असावे.


*सुंदर जीवन आपल्याच मनाने व वागण्याने जगता आले पाहिजे. शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक घेतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेता येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न जगलं तर ...?

*आयुष्य खुप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. तसेच दुसऱ्यालाही आनंदात जगु द्या. एकमेकांना प्रेम द्या, अडचणीत मदत करा, संकटसमयी धीर घ्या, आधार द्या.


*हीच विचारसरणी अंगी बानवूया,*

*चला आनंदाने जगू या...।*


✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...