Sunday, July 30, 2023

थोडसं रिलेशनशिपबद्दल.

 "थोडसं रिलेशनशिपबद्दल.."



सध्याच्या तरुणाईचा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय म्हणजे रिलेशनशिप, रिलेशनशिप हा जितका जिव्हाळ्याचा विषय आहे तितकाच तो मानसिक त्रासाचा सुध्दा विषय होत चालला आहे. "एखाद्या मुलाच्या आयुष्यात असलेली ती किंवा एखाद्या मुलीच्या आयुष्यात असलेला तो" याही पलीकडे एक सुंदर आयुष्य आहे हे आपण विसरूनच जात आहोत.


प्रेम हे जरी चेहरा पाहून होत असलं तरीही ते टिकतं मात्र चांगल्या स्वभावामुळे व एकमेकांचा एकमेकांवर असलेल्या विश्वासामुळे. सुरुवातीला एकमेकांचे स्वभावगुण माहित नसल्यामुळे नात आनंदात राहत; परंतू काही दिवसांनी जेव्हा एकमेकांचे गुण, सवयी अशा एक एक गोष्टी माहित व्हायला लागतात, तेंव्हा नात्यांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात होते. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे आपण त्या व्यक्तीवर जरा जास्तच अधिकार गाजवायला लागतो. तिने आपण जसं म्हणतो अगदी तसचं वागायला पाहिजे. असं आपल्याला वाटतं. आणि इथूनच खर नातं बिघडायला सुरुवात होते. अशा स्वभावामुळे नात्यांमधील जीवंतपणा कमी होतो; कारण प्रत्येक व्यक्ती हा जन्मतःच स्वतंत्र असते. आपल्यावर अधिकार गाजवणे हे कोणालाच आवडत नसते.


यांपुढे जर आपल्याला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर कोणत्याही व्यक्तीमध्ये एवढपण अडकून पडू नका, की ती व्यक्ती जर आपल्याला सोडून गेली तर आपल्याला आपलं जगणच नकोसं वाटेल. त्यांपेक्षा एकाच व्यक्तीवर एवढं प्रेम करण्यापेक्षा आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर मनापासून प्रेम करायला शिकूया. आपल्याला आजपासून प्रेमाची व्याप्ती वाढवायला शिकायचं आहे. तसेच आयुष्य हा एक प्रवास आहे ज्या व्यक्तीचं स्टेशन आलं तो व्यक्ती उतरणारच आहे भलेही तो व्यक्ती कितीही आवडत असला तरीही.म्हणूनच जर कोणी तुम्हाला सोडून गेलं तर एवढं पण वाईट वाटायचं कारण नाही. प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे स्वतंत्र आयुष्य आहे. हे मान्य करून आपण आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करूया.



✍️वसुधा इंगळे

Thursday, July 27, 2023

आपण आपल्या कमतरता शोधून, त्या दूर करूया

 आपण आपल्या कमतरता शोधून, त्या दूर करूया


एखादी मर्सिडीज कार असेल किंवा आणख दुसरं कोणतही वाहन असेल या वाहनांच्या टायरमध्ये जर काटा असेल किंवा खिळा असेल तर आपण ते असच टायरमध्ये ठेवून पुढील प्रवास करू शकत नाही. तो खिळा किंवा काटा आपल्याला काढावा लागतो. मग ती गाडी कोणतीही असो. तसेच आपल्या पायात सुध्दा काटा असेल तर आपण कितीही गडबडीत असलो तरीही आपल्याला तो काटा वेळ देऊन काढावाच लागतो तरच आपला पुढील प्रवास सुखकर होतो.


अगदी याचप्रमाणे आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत असु. ते स्पर्धा परीक्षेच क्षेत्र असेल किंवा व्यवसायाचं क्षेत्र असेल यांमध्ये आपल्याला आपल्या कमतरता शोधून त्या कशा दूर करता येतील हे पाहावे लागेल. आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे. यात काहीही चुकीच किंवा वाईट वाटून घेण्यासारखं नाही. परंतू आपण आपल्या कमतरता काय आहेत हे न शोधणे किंवा त्या कमतरता लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणे हे नक्कीच चुकीच आहे.


आपल्यातील प्रत्येकालाच मोठं होण्याची, महान बनण्याची इच्छा आहे परंतु प्रत्येकजण महान बनत नाही कारण महान बनण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात. आपल्या कमतरता शोधून त्या दुर करण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते प्रयत्न प्रत्येक व्यक्ती घेत नाही. मी एक वाक्य वाचलं होत ते म्हणजे, जर ध्येयाच्या प्रवासाला एक हजार व्यक्ती निघाले तर त्यामधील  एकच तो ध्येयाचा प्रवास पूर्ण करतो बाकीचे उरलेले सर्व जण कुठ ना कुठ अडकून पडतात. एखादा अडथळा येतो किंवा कोणाला तरी अशा गोष्टीचा मोह होतो आणि हा मोहच त्याला ध्येयापासून बाजूला घेऊन जातो.


आपल्यातील प्रत्येकाला आज हे शोधावं लागेल की माझ्या ध्येयापुढे कोणते अडथळे येत आहेत, कोणत्या अशा कमतरता आहेत ज्यांमुळे मी माझ्या ध्येयापर्यंत पोहोचणार नाही हे शोधून प्रत्येक कमतरता कशी दूर करता येईल यांसाठी प्रयत्न करावे लागतील


✍️वसुधा इंगळे

Wednesday, July 26, 2023

प्रेम आणि काळजी

 प्रेम आणि काळजी

काळजात जर प्रेम असेल तर ते नेहमी काळजीतुन व्यक्त होत असत.... पण अति काळजी आणि अति प्रेम हे दोन्हीही वाईट असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीला बॅलन्स करता आलं पाहिजे. जसं का साखर गोड आहे म्हणून चहा मध्ये कपभर टाकत नाही किंवा मिठाशिवाय चव नाही म्हणून मुठभर मीठ टाकत नाही. त्याच पद्धतीने काळजी आणि प्रेम हे लिमिटमध्ये असेल तरच त्याचा आनंद मिळतो अन्यथा त्याचा त्रास होतो.. अगदी तुमच्या रक्ता मासाचे जरी नाते असले तरीसुद्धा प्रत्येकाचे आपले वेगळे विश्व असते प्रत्येकाला त्याची स्पेस हा द्यायलाच हवी....

      अर्थात ती स्पेस एवढिही नको की त्यात कसलीच माया भावना नाही थोडक्यात, काय तर प्रत्येक गोष्ट की बॅलन्स असण गरजेचे आहे... 

      प्रश्न निर्माण करणारी माणसं हुशार असतात पण प्रश्नच निर्माण होऊ नयेत म्हणून जी काम करतात ती माणसं बुद्धिमान असतात....माणसांचा सहवास अत्तराच्या दुकानासारखा असतो काहीही खरेदी केले नाही तरी मन सुगंधीत तथा उल्हसित होते..... पण सातत्याने तोच सुवास डोकेदुखीला ही कारणीभूत ठरतो.... म्हणूनच लक्षात ठेवा " अती " कोणतीही गोष्ट नसावी...


✍️वसुधा इंगळे

इग्नोर

 इग्नोर


जी व्यक्ती तुमच्याशी बोलल्याशिवाय राहू शकत नाही.

 अशा व्यक्तीला कधीच ignore करु नका, किंवा त्याच्याशी वाईट वागून त्याला गमवू नका. 

कारण जीवनात वेळ काढून बोलणारे लोक तुम्हाला खूप भेटतील, पण तुमच्याशी बोलण्यासाठी आतुरतेने वाट पाहत बसणारे मोजकेच असतात.

✍️वसुधा इंगळे

Monday, July 24, 2023

इर्शाळगड

इर्शाळगड



 इर्शाळगडाच्या पायथ्याशी

 नांदत होते एक गांव, 

क्षणात झाले भुईसपाट 

इर्शाळवाडी त्याचं नाव...


चिल्ल्यां पिल्ल्यांचा तो आवाज 

अचानक दबला गेला, 

गोठ्यातच अंत झाला...

हंबरणाऱ्या जनावरांचा


जीता जागता माणूस 

जमिनीत गाडून मेला, 

रक्ताच्याच पावसाने 

रक्ताचा चिखल झाला...


असा कसा हा निसर्ग

गावावर होता कोपला,

हुंदक्यात अडकला श्वास 

चहूकडे फक्त चिखलच सोडून गेला...


माळीन, तळीये नंतर आता इर्शाळवाडी 

अजुन किती नाहक बळी जाणार ?? 

का समजत नाही मानवाला, 

की तो सुद्धा असाच वागणार...

निसर्गाच्या विरुद्ध वागलो

की तो सुद्धा असच विरुद्ध जाणार...


निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...