Wednesday, January 11, 2023

प्रेमातलं वेड

 प्रेमातलं वेड...!


जेव्हा निःस्वार्थ मनानं कुणाला तरी स्वीकारलं जातं अन जीवापाड त्याला जपण्याची ओढ लागते ते म्हणजे निस्सीम प्रेम.


 प्रेम हा शब्द आजही कायम आहे पण काळाच्या ओघात त्याचा अर्थ मात्र बदलत गेला.

प्रेम ही मुळात एक नितळ अन निरागस भावना आहे.

मानवी भावभावनांतील सर्वोच्च व सर्वोत्तम भावना म्हणजे प्रेम. प्रेम समजून घ्यायचं असेल, प्रेम जगायचं असेल, प्रेम अनुभवायचं असेल, प्रेम करायचं असेल तर या सगळ्यांसाठी एकच गोष्ट लागते ते म्हणजे उदार मन.

प्रेमात संयम बाळगावा लागतो. न बोलता खूप काही समजून घ्यावं लागतं. खूप काही मोकळ्या मनानं सोडावं लागतं. खूप काही मोठ्या मनानं स्वीकारावं लागतं. तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं प्रेम पूर्णत्वाला येतं. प्रेम ही नुसती एक भावना नसून अनेक भावभावनांचे उगम स्थान आहे. प्रेमात आदर, मान-सन्मान, जिव्हाळा, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, विश्वास हे सगळं असतं. नुसतं सौंदर्यावर भाळून प्रेम कधीचं होतं नसतं हेही तितकच खरं आहे.

उगाच डोळ्याला भावलेल्या सौंदर्याला प्रेम म्हणून गालबोट लावण्यात काही अर्थ नाहीये.


प्रेमाला अनेक दूषणे मिळाली अन अनेक भूषणे पण मिळाली. प्रेम हे सदासर्वकाळ चांगल असतं. कुणीतरी आपल्याला स्वीकारलं नाही म्हणून प्रेमाला वाईट म्हणणं मुळातच चुकीचं आहे कारण निवडलेली व्यक्ती चुकीची असू शकते पण प्रेम चुकीचं वा वाईट कधीच नसतं. एखाद्याला दोष देणं हे कधीचं प्रेम होवू शकत नाही.

प्रेम ही भावना खूप व्यापक आहे. प्रेम हे स्वातंत्र्य बहाल करतं त्याला बंधन नसतात. व्यक्तीची निवड चुकीची असू शकते किंवा समोरच्याची भावना वेगळी असू शकते अन इथंच प्रेमावर वाईट असण्याची मोहर लावली जाते.

जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमासाठी कुणालातरी दोष देतो वाईट म्हणतो तेव्हा त्यानं स्वतः विचार करण्याची गरज असते. समोरच्या व्यक्तीच्या भावना वेगळ्या असतील वा त्याची आवड वेगळी असेल तर आपण त्याचा अट्टाहास धरून आपला स्वतःच्या आनंद गमावून बसतो अन त्या व्यक्तीला दोष देण्यात धन्यता मानतो. जेव्हा प्रेम दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे केलं जातं तेव्हा ते प्रेम निस्सीम प्रेम होत जातं. प्रेम जरी एकतर्फी जडलं असेल ते मनात ठेवावं त्यासाठी कुणालाही आपल्याला स्वीकारण्यास भाग पाडू नये तेव्हा त्या एकतर्फी प्रेमाला अर्थ आहे. एकतर्फी प्रेम यात एकतर्फी शब्दात सगळं काही आलं. ते म्हणजे विमानतळावर बसून जहाजाची वाट पाहण्यासारखं आहे.

प्रेम असं काही ठरवून होतं नसतं किंवा एक नजरेत वा एका दिवसात सुद्धा होतं नसतं. प्रेम ही एक भावना आहे ती दिवसागणिक वाढत जाते. प्रेमाची सुरूवात बहुदा ही सहवासातून होतं असते. जेव्हा सहवास वाढतो तेव्हा विचारांची देवाण घेवाण होते. चर्चा घडून येते, भावना व्यक्त केल्या जातात. सहवासातून खऱ्या अर्थानं प्रेम ही भावना हळू हळू पूर्णत्वाला येत असते. 

संयम हा प्रेमात खूप महत्त्वाचा घटक ठरतो. 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' असं करून जमतं नाही. कधी कधी काही व्यक्ती व्यक्त होण्यासाठी वेळ घेतात. सगळ्यांत महत्त्वाचं आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे त्या व्यक्तीच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. त्या व्यक्तीचे विचार काय आहेत त्याच्या मनात काय आहे हे थोडं फार तरी डोकावून पाहिलं पाहिजे. जर आपलं प्रेम आहे तर ते समोरच्या व्यक्तीला जाणवतं आहे का ? जाणवत असेल तर त्याची काय प्रतिक्रिया आहे ? या गोष्टी आपण आपल्या पडताळून पाहिल्या पाहिजे. निव्वळ आपण आपल्या भावविश्वात गुंताण्यापेक्षा समोरून प्रतिसाद काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर उगाचच आपण फक्त आपल्या भावना किती घट्ट आहे किती प्रामाणिक आहे हे समोरच्याला सांगत बसण्यात काही अर्थ नाहीये. प्रेम आहे म्हटल्यावर थोडा संयम हवा अन थोडी वाट पाहण्याची तयारी पण हवीच. नुसतं आपल्या एकट्याला वाटतं आहे म्हणून सगळं आपल्याच मनासारखं घडावं ही अपेक्षा ठेवणं सुध्दा चुकीचं आहे. आपण आपल्या भावना मनात ठेवायच्या अन योग्य वेळ आली की त्या व्यक्त करायच्या. जर काही सकारात्मक वाटलं तर त्या वाटेवर चालणं ठीक आहे. नाहीतर गोष्ट जिथं आहे तिथंच सोडलेली कधीही बरी. नाहीतर उगाचच रोज नव्यानं तोच कित्ता गिरवत बसण्यात काही अर्थ नाही.

समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल प्रेम भावना नाही. तो आपल्या स्वीकारायला तयार नाही. तर आपण त्या गोष्टीचं दुःख मानायच नाही. ज्याला आपल्या प्रेमाच्या भावना कळू शकल्या नाहीत त्याला आपल्या दुःखी होण्याने किती फरक पडेल कुणास ठाऊक. आपल्या प्रेमासाठी कुणाला तरी भाग पाडणं अन त्यानं आपल्याला स्वीकारावं हा अट्टाहास धरणं सुध्दा चुकीचं आहे. कारण मनाविरुद्ध जावून जगाच्या पाठीवर कुणीच आनंदी राहू शकलेलं नाही. आपण आपल्या स्वतःमध्ये आनंद शोधला पाहिजे. आपल्याला कुणीतरी आवडलं यापेक्षा आपण कुणालातरी आवडलं पाहिजे असं वर्तन ठेवून आपण आपली वाट चालली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे ते मनमुराद जगले पाहिजे. आपणच आपल्या आवडीने त्यात इंद्रधनुप्रमाणे रंग भरले पाहिजे. आपले बहरलेले रंग पाहून जे फुलपाखरू स्थिरावेल त्याला जपलं पाहिजे. त्याला बंधनाची मर्यादा न ठेवता मनसोक्त फिरू दिलं पाहिजे. सरतेशेवटी इतकचं म्हणावंस वाटतं.

"येणाऱ्याला मनाच घर अन जाणाऱ्याला मनाच दार नेहमी उघडं ठेवावं"


 ✍️वसुधा इंगळे

#वेड #प्रेम #निस्सीमप्रेम

No comments:

Post a Comment

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...