तुमच्या वेदनांमध्ये शांतता ठेवा
आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खूप छळते. चिडचिड, रडरड मागे लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणूस खचून जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काही जण आयुष्य संपवून टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.
खरंतर हीच वेळ असते उठायची, यासोबत दोन हात करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची, कष्ट करायची, हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्येक गोष्टींचा त्याग करायची!
एक अशी वेळ, ज्या ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता तुझा सूड घेण्याइतकी तुझी पात्रता लायकी नाही, असं म्हणून त्यांना सोडून द्यायचं.
अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा. त्यामुळे सूडबुद्धीने स्वतःचं अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेवूच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते असं निर्माण करा की, तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील!
तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल असे समजा. काही लोकांना वाईट गोष्टी करण्यासाठी अथवा लोक वाईट बोलण्याकरताच बनवले आहे. तसेच, आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठीच बनवलेले आहे म्हणून आनंदात राहा.
✍️वसुधा इंगळे
No comments:
Post a Comment