Saturday, December 31, 2022

आयुष्याचा प्रवास


 आयुष्याचा प्रवास...!

जन्म जरी एकदा होत असला तरी सूर्याचं उगवण रोज नवीन जन्म देत असतं. मरण येण्याआधीच इथं जीवंतपणी मरावं लागतं. जगण्यासाठी इथं दिवस दिवस झुरावं लागतं. येणारा प्रत्येक दिवस नवीन काही घेऊन येत असतो पण त्याची चाहूल सुद्धा लागत नाही की उद्या आपल्या पुढे काय येईल. जे काय वाट्याला येईल त्याला पदरात घेत समोर चालावं लागतं. कधी कधी परिस्थिती आयुष्याचे सगळे गणित बदलून जाते.

आयुष्य मोठं आव्हान असतं. हे आव्हान पेलताना माणसं ओळखता येणं खूप गरजेचं असतं.

अनेक माणसं आयुष्यात गरजेनुसार येतात आणि जातात. प्रत्येकाचा हेतू वेगळा वेगळा असतो तसेच त्यांची वेळ सुद्धा ठरलेली असते.

जेव्हा केव्हा खंबीरपणे साथ पाहिजे असते. तेव्हा मात्र बहुदा कुणी नसतं. मोजकी दोन चार माणसं सदासर्वकाळ कायम पाठीशी उभे असतात तेच खरे आपले असतात.

काही सोबत राहून नंतर खूप चांगला अनुभव मागे सोडून जातात. कधीकाळी ज्यांना जीवापाड प्रेम केलेलं असतं तेच अतीव दुःख देऊन जातात.

तेव्हा मात्र स्वतःलाच सावरावे लागते.

जेव्हा वाईट काळातून जाण्याचा प्रसंग येतो. तेव्हा खूप काही सहन करण्याशिवाय पर्याय राहत नाही.

सुख,दुःख,यश,अपयश,आनंद,भोग, आशा, निराशा, बरं, वाईट,प्रेम,विरह, यांच्यातलं थोडं थोडं निरंतर वाट्याला येतं. नियतीच्या मनात काय असते ते इथं आज पर्यंत कुणालाही उमगले नाही. ती जे झोळीत टाकेल त्याला मात्र स्वीकारावं लागतं. अडथळे समस्या यांना सामोरे जात स्वतःच वाट शोधत आपल्या पाऊलखुणा मागे सोडत चालाव लागतं. कधी कधी दुःखाचे डोंगर असे कोसळायला लागतात जणू आयुष्याचा शेवट जवळ आल्याचा भास तयार करतात.

विश्वास आणि घात हे आयुष्याचा वळणाची दिशा ठरवत असतात. जर विश्वासाची चार माणसं आयुष्यात असतील तर मनाला धीर लागतो. विश्वास दाखवला कि नवीन उमेद जन्माला येते. पाठीशी विश्वास दाखवणारे ठाम राहिले कि आयुष्याची अर्धी लढाई जिंकल्यात जमा असते.

घात हा कधीच अपेक्षित धरलेला नसतो पण तो 

वेळोवेळी मोजक्या जवळच्या लोकांकडून भेट दिला जातो ज्याची आपण कधी अपेक्षा हि ठेवत नसतो.

आयुष्यात मित्र परिवार हा असा एक वेगळा गट असतो. जो आपण घरदार, नातलग, समाज इत्यादींना बाजूला ठेवून स्वतःच्या पायावर उभा केलेला असतो. त्याचे प्रतिबिंब न कळत आयुष्यावर उमटत असतं. शरीराला ज्याप्रमाणे श्वासांची गरज असते त्याचप्रमाणे आयुष्य जगतांना मित्र जवळ असावे लागतात.

दगडांच्या गर्दीत आपल्यासाठी हे परीस असतात.

या जगात चांगले मित्र मिळणं म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील शिंपल्यात मोती सापडल्या सारखं आहे. त्यामुळे त्यांना जपणं हे अतिशय महत्त्वाच असतं. दुःखात आधार आणि सुखात आनंद साजरा करण्यासाठी हे आयुष्यात असावेच लागतात नाहीतर आयुष्य निरर्थक वाटायला लागतं.

संधी आणि संकट आयुष्यात पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. कठीण काळात संघर्ष करतांना जी धडपड सुरू असते तेव्हा कधी कधी न कळत संधी ही हाताला लागते. मित्र, नातलग, परिवार, समाज म्हणून बहुरूपी भूमिका वाट्याला येते. चांगली पार पाडली तर कौतुक मिळतं ते पण थोड्या प्रमाणात जेव्हा भूमिकेत कसर राहिली कि अवमानाची खैरात केली जाते. माणसाला मन एकच असतं पण त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येकाला वाटतं त्यानं त्यांचा मनाप्रमाणे वागावं इथंच तर अनके नात्यांची समीकरण बदलली जातात.

जन्म-मृत्यू या दोन बिंदू मधील अंतर पार करण्यासाठी अख्खी हयात खर्ची घालावी लागते.

आयुष्य संघर्षात जगत असतांना शेवट मात्र कसा होईल हे गूढ रहस्य असतं.

शेवटी इतकचं म्हणावसं वाटतं 

आयुष्य हे दिवसागणिक अनुभवांनी समृद्ध होत जावं.

जे वाट्याला आलं त्याला हसत स्वीकारता यावं.

काटा बनून रुतण्यापेक्षा फुलांपरी रोज नव्याने उमलता यावं...!

✍️वसुधा इंगळे

#आयुष्याचाप्रवास

बालपणी चा काळ सुखाचा





 

बालपणी शाळा नसत्या तर बालपणी चा काळ किती सुखाचा झाला असता. 


सुट्टी सक्तीची पण शिक्षण मात्र ऐच्छिक असावा असं माझं मत होतं.


पण मला शिक्षणाची आवड नव्हती अस मुळीच नव्हतं.


पण...आंबे पिवळे का होतात? नारळा मध्ये गोड पाणी कोण ओतत? आपण रोज गाणी म्हटली तर काय होईल किंवा गाभोळलेली चिंच झाडावर कशी येते? 


असे सगळे विषय शिकवायचे सोडून, शाळेत इतर सगळे विषय शिकवले जात होते.


आपण रोज प्रार्थना म्हणतो, मग देव आपल्याला गणितात मार्क देताना दुष्ट का होतो.


अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला शाळेत कधीच मिळाली नाही.


✍️वसुधा इंगळे

Friday, December 30, 2022

लफडी

 बॉसने सेक्रेटरीला फोन केला , ''

एका आठवड्यासाठी आपण

बाहेरगावी चाललो आहोत .

त्यासाठीची सगळी व्यवस्था कर .''

.

.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''

एका आठवड्यासाठी मी बाहेरगावी जाणार

आहे बॉसबरोबर .''

.

.

.

नव-याने प्रेयसीला फोन केला , ''

एका आठवड्यासाठी माझी बायको बाहेरगावी जाणार

आहे . तू माझ्या घरीच राहायला ये .''

.

.

.

प्रेयसीने आपल्या प्रायव्हेट

ट्यूशनच्या विद्यार्थ्याला फोन केला , ''

मी एका आठवड्यासाठी बाहेर चालले

आहे . तुला ट्यूशनला सुट्टी .''

.

.

विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , ''

बाबा , माझ्या ट्यूशनला आठवडाभर

सुटी आहे . मला कुठेतरी घेऊन

चला ना फिरायला .''

.

.

.

बाबांनी त्यांच्या सेक्रेटरीला फोन

केला , ''

हा आठवडा मी माझ्या मुलाबरोबर

घालवणार आहे . बाहेरगावी जाणे रद्द .''

.

.

.

सेक्रेटरीने नव-याला फोन केला , ''

बाहेरगावी जाणे रद्द .''

.

.

.

नव-याने प्रेयसीला फोन केला , ''

आपली भेट रद्द .''

.

.

.

प्रेयसीने विद्यार्थ्याला फोन केला , ''

माझे जाणे कॅन्सल झाले आहे . तुझी ट्यूशन

सुरूच राहील .''

.

.

.

विद्यार्थ्याने बाबांना फोन केला , ''

ट्यूशन सुरूच राहणार आहे . आपलं जाणं रद्द 

पृथ्वी गोल आहे आणि सगळा झोल आहे.


वाचा! हसा! हसत राहा!

✍️वसुधा इंगळे

You happy ! I am happy

शुन्यातून विश्व, की विश्वातून शून्य


शुन्यातून विश्व, 

     की विश्वातून शून्य ...!!!

          टू रुम किचनचा 

               एखादा फ्लॅट ...

                    दोन चार एकरचं 

                         फार्म हाऊस ...,

                    एखादी चार चाकी गाडी 

               आणि भौतिक वस्तूंचं 

          प्रदर्शन मांडता आलं, की

     आपण म्हणतो ...

अमक्या-तमक्यानं 

     शून्यातून विश्व 

          निर्माण केलं ....!!!

               म्हणजे होतंय कांय, की 

                    सुख मिळेल, या आशेनं 

                    माणूस श्रीमंत होण्यासाठी

              धडपडतोय, पण सुखी 

          कांही दिसत नाही ...!!!

     आपणचं म्हणतो, की

आमच्या लहानपणी खूप 

     मजा यायची ...

          खूप करमायचं, 

               घर भरलेलं असायचं ...

                    दिवस कधी मावळायचा 

               ते कळायचंच नाही ...!!!

          मग आता

     कांय झालं ???

मजा कुठं गेली ???

     एकटं एकटं कां वाटतं ...???

          छातीत धडधड कां होते ...???

               कशामुळं करमत नाही ...???

                    कारण...

              "विश्व निर्माण करण्याची" 

          व्याख्या कुठंतरी चुकली ...!!!

     विश्व निर्माण करणं 

म्हणजे ...

नाती गोती जपणं ...

     छंद जोपासणं ...

          पाहुणे होऊन जाणं ...

               पाहुण्यांचं स्वागत करणं ...

                    खूप गप्पा मारणं ...

               घराच्या उंबऱ्यात 

          चपलांचा ढिग दिसणं ...

     खळखळून हसणं ...

आणि ...

     काळजातलं दुःख सांगून

          मोकळेपणानं रडणं ...!!!

               या गोष्टी आपण

                    प्राप्त करू शकलो, तर ...

               "शून्यातून विश्व 

          निर्माण केलं" असं म्हणावं ...

     तुम्हीच सांगा ... 

आपल्या आयुष्यांत या 

     सर्व गोष्टींची वाढ झाली, 

          की घट झाली ...???

               तुमचं खरं दुःख तुम्ही

                    मोकळेपणानं किती 

               जणांना सांगू शकता ???

          असे किती मित्र, शेजारी,

     नातेवाईक आपण निर्माण 

करू शकलो ...???

     खूप कमी, 

          किंबहूना नाहीच ...!!!

               मग आपण 

                    "विश्व निर्माण" 

                केलं कां ...???

          तर नाही ...

     मित्रहो, 

रजिस्ट्रीच्या कागदाच्या 

     फायली म्हणजे विश्व ...???

          भौतिक साधनांची रेलचेल 

               म्हणजे विश्व ...???

                    नाही ...!!!

               लॉकरमध्ये ठेवलेले 

          हिरे मोत्यांचे दागिने 

     म्हणजे विश्व ...???

मुखवटे घातलेल्या 

     चेहऱ्यांची गर्दी 

          म्हणजे विश्व ...???

               नाही ...!!!

                    हे समजून 

               घ्यावं लागेल ...!!!

          मोठं बनण्याच्या

     दडपणामुळं ...

आणि मग कामाच्या 

     व्यापामुळं ...

          नाती दूर जाणार 

                असतील, ...

                    इतरांना तुच्छ लेखण्यामुळं

               आणि अहंकारामुळं माणसं 

          जवळ येणार नसतील...

      दुःख सांगायला, 

मन हलकं करायला 

     जागांच उरणार नसेल, 

          तर ...

               आम्ही शून्यातून 

                     विश्व निर्माण केलं,  

                की ...

         विश्वातून शून्य...?????

 🌷🌷🌷🌷🙏🏻🌷🌷🌷🌷

           ( पु लं.च्या एका‌ संग्रहातून )

✍️वसुधा इंगळे

आळस हीच शोधाची जननी

मी फक्त एक उदाहरण देणार आहे. कारण मोठी पोस्ट वाचण्याचा लोक आळस करतात.

मानवाला कच्चे अन्न खाण्याचा ( शक्तिनिशी तोडण्याचा आणि तासनतास चावण्याचा ) आळस   आला म्हणून चुल आली.

चुल पेटवण्याचा आळस  म्हणून त्याने स्टोव्ह आणला. सतत रॉकेल भरण्याचा आळस  म्हणून गॅस आणला.

सिलेंडर संपल्यावर नवीन आणा, जूना काढा,  नवीन लावा. या कामाचा आळस आला म्हणून नळीने गॅस आणला.

गॅसवर पदार्थ गरम होईपर्यंत लक्ष ठेवण्याचा आळस येतो म्हणून  ओव्हन आला.

आता सगळ्याच सोयी सुविधांचा वापर करण्याचा आळस आला म्हणून तो निघाला नाविन्याच्या शोधात.

तो आता पांचशे रुपयाचे पेट्रोल आणि चार तास खर्च करुन चुलीवरचे जेवण जेवायला घरापासून वीस किलोमीटर दूर जातो. दोन हजार रुपये बील पे करुन घरी परत येतो.

सुरुवातीलाच चुल वापरायचा आळस केला नसता तर आज त्याला तिन्ही त्रिकाळ चुलीवरचे जेवण, चुलीवरचा चहा, चुलीवरची मिसळ मिळाली असती.

मला टाईप करण्याचा आळस आला आहे, नाहीतर मी अशाच अनेक विषयावर लिहिले असते.

कसे लिहिले आहे हे 🤔 सांगण्याचा आळस मात्र करू नका😄

✍️वसुधा इंगळे

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...