Thursday, January 12, 2023

राजमाता जिजाऊ


राजमाता जिजाऊ
        


ज्यांनी घडविला,

महाराष्ट्राचा भाग्यविधाता,

धन्य त्या थोर,

जिजाऊ राजमाता !

आज १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस, प्रथम या थोर जिजाऊ आईसाहेबांना माझा मानाचा मुजरा ! हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापवीर संभाजी महाराज या दोन छत्रपतींना घडवणा-या जिजाऊ आदर्श राजमाता होत्या.

जिजाऊंचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव आणि आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. लहान वयात त्यांचा विवाह शूर, पराक्रमी वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.

राजमाता जिजाऊंचे जीवन म्हणजे संस्काराचा अनमोल खजिना होता. मातृत्व, नेतृत्व आणि कर्तत्व या तीन गुणांचा सुरेख संगम त्याच्यांत झालेला होता. त्यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहिले होते.

हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी शिवबांवर उत्तम संस्कार केले. लहानपणी शिवबांना रामायण तसेच महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या, शिक्षणाबरोबरच त्यांनी शिवबांना तलवार बाजी व युद्धकौशल्यही स्वतः शिकवले.

शिवरायांचे व्यक्तिमत्त्व आदर्श घडवले. राजमाता जिजाऊ, ह्या शिवरायांच्या आदयगुरू होत्या. त्यांचे कार्य शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे. शिवाजी महाराजांच्या प्रत्येक कठीण प्रसंगी जिजाऊंनी खंबीर मार्गदर्शन केले.

शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाची स्वारी, शिवरायांची आग्रा कैद व सुटका अशा स्वराज्यावर आलेल्या एकाहून एक प्रचंड संकटांचा सामना करण्याची प्रेरणा त्यांनी शिवाजी राजेंना दिली.

जिजाऊ गोरगरीब, सामान्य जनतेच्या माऊली आणि सावली होत्या. त्यांनी शिवाजी महाराजांना रयतेचा तसेच स्त्रियांचा रक्षणकर्ता म्हणून तयार केले. ६ जून १६७४ रोजी हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक पाहून जिजाऊ माऊली खुश झाल्या.

यानंतर १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊंनी पाचाड या गावी आपले जीवन- कार्य संपवले व स्वर्गाची वाट धरली. राजमाता जिजाऊ स्वराज्याच्या प्रेरणा होत्या. त्यांच्या वात्सल्यात स्वराज्याच्या लहान रोपट्याचा वटवृक्ष झाला. अशा या थोर राजमाता जिजाऊंना माझे कोटी कोटी प्रणाम !

धन्यवाद !

जय जिजाऊ, जय शिवराय,
जय महाराष्ट  

✍️वसुधा इंगळे

वेदनांमध्ये शांतता ठेवा!

 तुमच्या वेदनांमध्ये शांतता ठेवा

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खूप छळते. चिडचिड, रडरड मागे लावते. अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणूस खचून जातो. एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काही जण आयुष्य संपवून टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरंतर हीच वेळ असते उठायची, यासोबत दोन हात करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची, कष्ट करायची, हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्येक गोष्टींचा त्याग करायची!

एक अशी वेळ, ज्या ज्या लोकांकडून तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता तुझा सूड घेण्याइतकी तुझी पात्रता लायकी नाही, असं म्हणून त्यांना सोडून द्यायचं. 

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा. त्यामुळे सूडबुद्धीने स्वतःचं अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेवूच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते असं निर्माण करा की, तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल असे समजा. काही लोकांना वाईट गोष्टी करण्यासाठी अथवा लोक वाईट बोलण्याकरताच बनवले आहे. तसेच, आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठीच बनवलेले आहे म्हणून आनंदात राहा.


✍️वसुधा इंगळे

Wednesday, January 11, 2023

प्रेमातलं वेड

 प्रेमातलं वेड...!


जेव्हा निःस्वार्थ मनानं कुणाला तरी स्वीकारलं जातं अन जीवापाड त्याला जपण्याची ओढ लागते ते म्हणजे निस्सीम प्रेम.


 प्रेम हा शब्द आजही कायम आहे पण काळाच्या ओघात त्याचा अर्थ मात्र बदलत गेला.

प्रेम ही मुळात एक नितळ अन निरागस भावना आहे.

मानवी भावभावनांतील सर्वोच्च व सर्वोत्तम भावना म्हणजे प्रेम. प्रेम समजून घ्यायचं असेल, प्रेम जगायचं असेल, प्रेम अनुभवायचं असेल, प्रेम करायचं असेल तर या सगळ्यांसाठी एकच गोष्ट लागते ते म्हणजे उदार मन.

प्रेमात संयम बाळगावा लागतो. न बोलता खूप काही समजून घ्यावं लागतं. खूप काही मोकळ्या मनानं सोडावं लागतं. खूप काही मोठ्या मनानं स्वीकारावं लागतं. तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं प्रेम पूर्णत्वाला येतं. प्रेम ही नुसती एक भावना नसून अनेक भावभावनांचे उगम स्थान आहे. प्रेमात आदर, मान-सन्मान, जिव्हाळा, प्रामाणिकपणा, एकनिष्ठता, विश्वास हे सगळं असतं. नुसतं सौंदर्यावर भाळून प्रेम कधीचं होतं नसतं हेही तितकच खरं आहे.

उगाच डोळ्याला भावलेल्या सौंदर्याला प्रेम म्हणून गालबोट लावण्यात काही अर्थ नाहीये.


प्रेमाला अनेक दूषणे मिळाली अन अनेक भूषणे पण मिळाली. प्रेम हे सदासर्वकाळ चांगल असतं. कुणीतरी आपल्याला स्वीकारलं नाही म्हणून प्रेमाला वाईट म्हणणं मुळातच चुकीचं आहे कारण निवडलेली व्यक्ती चुकीची असू शकते पण प्रेम चुकीचं वा वाईट कधीच नसतं. एखाद्याला दोष देणं हे कधीचं प्रेम होवू शकत नाही.

प्रेम ही भावना खूप व्यापक आहे. प्रेम हे स्वातंत्र्य बहाल करतं त्याला बंधन नसतात. व्यक्तीची निवड चुकीची असू शकते किंवा समोरच्याची भावना वेगळी असू शकते अन इथंच प्रेमावर वाईट असण्याची मोहर लावली जाते.

जेव्हा जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमासाठी कुणालातरी दोष देतो वाईट म्हणतो तेव्हा त्यानं स्वतः विचार करण्याची गरज असते. समोरच्या व्यक्तीच्या भावना वेगळ्या असतील वा त्याची आवड वेगळी असेल तर आपण त्याचा अट्टाहास धरून आपला स्वतःच्या आनंद गमावून बसतो अन त्या व्यक्तीला दोष देण्यात धन्यता मानतो. जेव्हा प्रेम दोन्ही बाजूंनी प्रामाणिकपणे केलं जातं तेव्हा ते प्रेम निस्सीम प्रेम होत जातं. प्रेम जरी एकतर्फी जडलं असेल ते मनात ठेवावं त्यासाठी कुणालाही आपल्याला स्वीकारण्यास भाग पाडू नये तेव्हा त्या एकतर्फी प्रेमाला अर्थ आहे. एकतर्फी प्रेम यात एकतर्फी शब्दात सगळं काही आलं. ते म्हणजे विमानतळावर बसून जहाजाची वाट पाहण्यासारखं आहे.

प्रेम असं काही ठरवून होतं नसतं किंवा एक नजरेत वा एका दिवसात सुद्धा होतं नसतं. प्रेम ही एक भावना आहे ती दिवसागणिक वाढत जाते. प्रेमाची सुरूवात बहुदा ही सहवासातून होतं असते. जेव्हा सहवास वाढतो तेव्हा विचारांची देवाण घेवाण होते. चर्चा घडून येते, भावना व्यक्त केल्या जातात. सहवासातून खऱ्या अर्थानं प्रेम ही भावना हळू हळू पूर्णत्वाला येत असते. 

संयम हा प्रेमात खूप महत्त्वाचा घटक ठरतो. 'उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग' असं करून जमतं नाही. कधी कधी काही व्यक्ती व्यक्त होण्यासाठी वेळ घेतात. सगळ्यांत महत्त्वाचं आपल्याला ज्या व्यक्तीवर प्रेम जडलं आहे त्या व्यक्तीच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. त्या व्यक्तीचे विचार काय आहेत त्याच्या मनात काय आहे हे थोडं फार तरी डोकावून पाहिलं पाहिजे. जर आपलं प्रेम आहे तर ते समोरच्या व्यक्तीला जाणवतं आहे का ? जाणवत असेल तर त्याची काय प्रतिक्रिया आहे ? या गोष्टी आपण आपल्या पडताळून पाहिल्या पाहिजे. निव्वळ आपण आपल्या भावविश्वात गुंताण्यापेक्षा समोरून प्रतिसाद काय आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे. नाहीतर उगाचच आपण फक्त आपल्या भावना किती घट्ट आहे किती प्रामाणिक आहे हे समोरच्याला सांगत बसण्यात काही अर्थ नाहीये. प्रेम आहे म्हटल्यावर थोडा संयम हवा अन थोडी वाट पाहण्याची तयारी पण हवीच. नुसतं आपल्या एकट्याला वाटतं आहे म्हणून सगळं आपल्याच मनासारखं घडावं ही अपेक्षा ठेवणं सुध्दा चुकीचं आहे. आपण आपल्या भावना मनात ठेवायच्या अन योग्य वेळ आली की त्या व्यक्त करायच्या. जर काही सकारात्मक वाटलं तर त्या वाटेवर चालणं ठीक आहे. नाहीतर गोष्ट जिथं आहे तिथंच सोडलेली कधीही बरी. नाहीतर उगाचच रोज नव्यानं तोच कित्ता गिरवत बसण्यात काही अर्थ नाही.

समोरच्या व्यक्तीला आपल्याबद्दल प्रेम भावना नाही. तो आपल्या स्वीकारायला तयार नाही. तर आपण त्या गोष्टीचं दुःख मानायच नाही. ज्याला आपल्या प्रेमाच्या भावना कळू शकल्या नाहीत त्याला आपल्या दुःखी होण्याने किती फरक पडेल कुणास ठाऊक. आपल्या प्रेमासाठी कुणाला तरी भाग पाडणं अन त्यानं आपल्याला स्वीकारावं हा अट्टाहास धरणं सुध्दा चुकीचं आहे. कारण मनाविरुद्ध जावून जगाच्या पाठीवर कुणीच आनंदी राहू शकलेलं नाही. आपण आपल्या स्वतःमध्ये आनंद शोधला पाहिजे. आपल्याला कुणीतरी आवडलं यापेक्षा आपण कुणालातरी आवडलं पाहिजे असं वर्तन ठेवून आपण आपली वाट चालली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे ते मनमुराद जगले पाहिजे. आपणच आपल्या आवडीने त्यात इंद्रधनुप्रमाणे रंग भरले पाहिजे. आपले बहरलेले रंग पाहून जे फुलपाखरू स्थिरावेल त्याला जपलं पाहिजे. त्याला बंधनाची मर्यादा न ठेवता मनसोक्त फिरू दिलं पाहिजे. सरतेशेवटी इतकचं म्हणावंस वाटतं.

"येणाऱ्याला मनाच घर अन जाणाऱ्याला मनाच दार नेहमी उघडं ठेवावं"


 ✍️वसुधा इंगळे

#वेड #प्रेम #निस्सीमप्रेम

Tuesday, January 10, 2023

सुखी राहण्याचा मार्ग


 *त्रासाच ओझ; सुखी राहण्याचा मार्ग*

🧘‍♂️ तथागत गौतम बुद्ध आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे शंका निरसन करत असत. समस्येतून उपाय सांगत असत. त्यांच्याकडे आलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या दुःखाची उकल करण्यासाठी तथागत बुध्दांकडे येत असे.


● एक दिवस एक व्यक्ती एक प्रश्न घेऊन भगवान बुद्धांच्या भेटीस आली. भगवान बुद्धांच्या नुसत्या दर्शनाने त्या व्यक्तीचे मन शांत झाले. 


● ही मनःशांती सातत्याने अनुभवता यावी, म्हणून त्या व्यक्तीने भगवान बुद्धांना प्रश्न विचारला, 'भगवान, आम्ही संसारी माणसं छोट्या छोट्या गोष्टींनी त्रासून जातो. 


● आम्हाला तुमच्यासारखं कायम आनंदी, कायम सुखी कसं बरं राहता येईल? कृपया मार्गदर्शन करा.'


● भगवान किंचित हसले. ते म्हणाले, 'यावर उपाय तुला आज नाही, उद्या देतो. उद्या सकाळी मी प्रभात फेरीसाठी जंगलात जाणार आहे, तेव्हा तू सुद्धा माझ्याबरोबर ये!'


● त्या व्यक्तीला वाटले, उचित जागी, उचित वेळी भगवान आपल्याला काहीतरी मंत्र सांगणार असावेत. त्याने होकार दिला आणि तो आनंदाने परतला.


● दुसऱ्या दिवशी सकाळी ठरलेल्या वेळी भगवान फेरफटका मारायला निघाले. तेव्हा ती व्यक्ती वेळेआधीच हजर झाली आणि भगवान बुद्धांबरोबर चालू लागली. 


● भगवान बुद्ध शांतपणे चालत होते. व्यक्तीच्या मनात चलबिचल सुरू होती. भगवान तो मंत्र कधी देतील याची त्याला उत्सुकता लागली होती. 


● तेव्हा भगवान बुद्धांनी वाटेत पडलेला एक जड दगड उचलला आणि काही न बोलता त्या व्यक्तीच्या हाती दिला. त्यानेही तो निमूटपणे हातात घेतला. दोघे चालत राहिले. 


● ठराविक अंतर कापून परतीच्या मार्गाला लागले. तरीही भगवान काहीच बोलेना. त्याची चिडचिड होऊ लागली आणि दगड हातात धरून हात प्रचंड दुखू लागला. त्याच संयम संपला. 


● तो म्हणाला, 'भगवान, हे ओझं आणखीन उचलवत नाही. हा दगड आता खाली ठेवून देऊ का?'


● भगवान बुद्ध हसून म्हणाले, 'अरे, तू हातात दगड घेऊन चालतोय हे मी केव्हाच विसरलो. तुला त्या दगडाचं ओझं होत होतं, तर कधीच टाकून द्यायचंस नाही का? माझ्या सांगण्याची काय वाट बघत बसलास?'


● 'पण भगवान, तुमच्या आज्ञेशिवाय मी खाली कसा ठेवणार होतो?' असे म्हणत तो मनुष्य हतबल झाला.


● बुद्ध म्हणाले, 'अरे पण यामुळे वेदना तर तुलाच सहन कराव्या लागल्या ना? हेच तुझ्या प्रश्नाच उत्तर आहे. आपण आयुष्यभर अनेक विषयांचं ओझं अकारण वाहत राहतो. त्याचा त्रास आपल्यालाच होतो. 


● आपल्याला होणाऱ्या त्रासाची दुसऱ्याला कल्पनाही नसते. त्याच्या सांगण्याची वाट पाहत न बसता, हे ओझं लवकरात लवकर टाकून देण्याची कला आत्मसात कर. मग बघ, आयुष्यभर सुखी होशील आणि आनंदीही!'


🙏 *तात्पर्य* : एखाद्याच्या बोलण्याचा, वागण्याचा आपण इतका त्रास करून घेतो, मनाला लावून घेतो, परंतु ज्याच्यामुळे आपल्याला त्रास झाला, त्याला ते माहीत पण नसत. मग आपण तरी त्रास का करून घ्यायचा? कोणाकोणाचा त्रास करून घ्यायचा? त्रासाच्या क्षणांमध्ये सुखाचे क्षण लोप पावत जातात. आयुष्याचा भरभरून आनंद घ्या. जे ओझं त्रास देतं, ते काढून टाका. प्रवास आपोआप सोपा होत जाईल.

✍️वसुधा इंगळे

डॉ.नानासाहेब थोरात


 इंग्लंडमध्ये काही वर्षांपूर्वी एका साडेतीन वर्षाच्या मुलीच्या समोर तिची गरोदर आई घरातील जिण्यावरून पडली आणि बेशुद्ध झाली. 


या तीन वर्षाच्या कोवळ्या जिवाने क्षणाचाही विलंब न करता ऍम्ब्युलन्सला फोन केला आणि तिच्या या फोनमुळे फक्त आईचाच नाही तर पोटातील बाळाचाही जीव वाचला. 

ऍम्ब्युलन्सला फोन करून ती मुलगी अनेक मिनिटे त्यांच्याबरोबर बोलत होती तिचे बोलणे संपते न संपते तोपर्यंत ऍम्ब्युलन्स दारात हजार झाली होती. 

जगातील अतिशय गर्दीचे शहर असलेल्या लंडनमध्ये सुद्धा एखाद्या अपघातानंतर सरासरी आठव्या मिनिटाला ऍम्ब्युलन्स हजर होते. 


संपूर्ण ब्रिटनमध्ये या मुलीच्या प्रसंगावधनाचे आणि धाडसाचे कौतुक झाले आणि या एका फोन कॉल मुळे ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अनेक सुधारणा केल्या. 

प्रश्न हा नाही कि त्या मुलीला ऍम्ब्युलन्स ऑपरेटर बरोबर बोलता कसे आले तर प्रश्न हा आहे की त्या एवढ्या छोट्या मुलीला आपली आई पडल्यावर ऍम्ब्युलन्सला फोन करायचा असते हे कसे समजले? 

ऍम्ब्युलन्सचा नंबर कुठून मिळाला?

या प्रश्नाचे उत्तर दडले आहे गृहपाठात.....!!!  

  

ब्रिटनमध्ये मुलं तीन वर्षाचे झाले कि त्याला शाळेत प्रवेश मिळतो, आई वडील दोन्ही नोकरीलाअसतील तर सहा तास रोज मुलं शाळेत थांबू शकते. या तीन वर्षाच्या मुलांना ना पाढे शिकवतात ना ABCD शिकवतात ना अभ्यासाचे ओझे देतात. याउलट या कोवळ्या जीवांना मोठ्यांशी कसे बोलायचे, रस्त्यावरून जाताना सिग्नलचे नियम कसे पाळायचे, गाडीमध्ये बसल्यावर सीटबेल्ट कसा लावायचा, आपली रूम कशी नीटनेटकी ठेवायची, खोटे बोलायचे नाही अश्या अनेक दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकवतात. 

आणि दररोज मुलांना शाळेत काय शिकवले जातेय ते पालकांना सांगितले जाते. 


फक्त सांगितलेच जात नाही तर संध्याकाळी घरी एकत्र जेवण करत असताना यावर चर्चा पण करायला प्रोत्साहित करतात ज्यामुळे मुलांना शाळेत शिकवलेले व्यवस्थित लक्षात राहील आणि हाच या मुलांचा गृहपाठ असतो. फक्त नियमच नाही तर आपलय रोजच्या जीवनात घरामध्ये प्लंबर, इलेकट्रीशियन, क्लीनर किंवा कचरा गोळा करणारे लोक, हॉस्पिटलमधील डॉक्टर, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, अगदी गॅरेजमध्ये जे लोक काम करतात त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात काय उपयोग असतो याचे प्रात्यक्षिक सुद्धा देतात. वर्षातील काही दिवस या लोकांना शाळेत बोलवून मुलांसमोर प्रात्यक्षिक दाखवतात. 

असेच एके दिवशी या मुलीच्या शाळेतसुद्धा ऍम्ब्युलन्सचे प्रात्यक्षिक होते, त्या बालमनांना त्या दिवशी जे काही वर्गात सांगितले आणि दाखवले त्याची चर्चा त्यांनी त्या रात्री जेवताना आपल्या आई वडिलांबरोबर गृहपाठ म्हणून केली. 

आणि तोच गृहपाठ त्या मुलीने लक्षात ठेवून आपल्या आईचा आणि तिच्या गर्भातील बाळाचा जीव वाचवला. 

पुढे जाऊन संपूर्ण ब्रिटनभर त्याची चर्चा झाली आणि ब्रिटन सरकारने आपल्या शिक्षणपद्धतीत अजून सुधारणा करून अधिक अधिक प्रात्यक्षिक आणि निरीक्षण आधारित केले. 


यामुळेच ब्रिटनमधील सर्वच शाळांमध्ये वर्षातील काही दिवस गॅरेज मेक्यानिकपासून ते शेतकरी आणि त्यांची जनावरे इथपासून ते हेलिकॉप्टर ऍम्ब्युलन्स डॉक्टर पर्यंत सर्वाना शाळेत बोलावून त्यांच्याकडून मुलांना प्रात्यक्षिक आधारित शिक्षण दिले जाते आणि त्याचा गृहपाठ रात्रीच्या जेवणावेळी पालकांकडून पक्का करून घेतला जातो. 

आम्ही कुठेय....? 

हा प्रश्न आम्हाला पडतो का? 


मुलांवर ओझे अपेक्षांचे 

गेले दोन दशके पाठीवरच्या दप्तराचे ओझे कमी करण्याचा चर्चा करत राहिलोय 

पण या बालमानच्या मनावरील ओझ्याचे काय? 

फक्त शाळाच या मुलांना दप्तराच्या आणि गृहपाटाच्या ओझ्यात दडपून ठेवतायत का? 

याला पालकपण जबाबदार नाहीत का? 


माझ्या मुलाला शाळेत गेले कि आकडे वाचायला आणि लिहायला आलेच पाहिजेत, मुलाना ABCD आलीच पाहिजे, सर्व खेळ आलेच पाहिजेत, 

याहूनही पुढे जाऊन त्यांना गाणे गायला आले पाहिजे एखादे वाद्य वाजवायला आले पाहिजे, असा सगळा अट्टाहास का? 


ज्या बालवयात मुलांनी मातीत खेळले पाहिजे, झाडावर चढले पाहिजे, नदी-विहरीत पोहले पाहिजे रात्री आई वडिलांबरोबर शाळेतील गमती जमतीच्या गोष्टी केल्या पाहिजेत त्या वयात इतरांचे मुलं मुलांसारखे स्टेजवर नाचवत, त्याची इच्छा नसताना शाळेचा नियम म्हणून गॅदरिंग मध्ये गाणी म्हणायला लावतोय, नाटकात भाग घ्यायला सांगतोय, हार्मोनियम, गिटार, तबल्याच्या क्लासला पण पाठवतोय, गणिताचा इंग्लिशच्या कलासला पण जबरदस्तीने बसवतोय. 

आणि यातून काही शिल्लक असेल तर सर्रास सर्व शाळा त्या कोवळया जीवांवर नवनवीन प्रोजेक्टचा मारा करत आहेत. आज पर्यावरणाचा उद्या चित्रकलेचा परवा कॉम्पुटरचा असे रोज नवनवीन प्रोजेक्ट त्या बालबुद्धीत अक्षरशः इंजेक्शनसारखे घुसवले जात आहेत. 

त्या कोवळ्या जीवाला त्याचा त्रास होतोय हे पालकांना आणि शिक्षकांना का समजत नाही. 

सात वर्षाचे मूल सकाळी सातला घरातून निघतेय ते रात्री सातला घरी येतेय. 

मनाने आणि शरीराने थकलेला तो जीव पुन्हा गृहपाटाच्या ओझ्याने आणि सकाळी पुन्हा लवकर उठण्याच्या चिंतने झोपी जातोय. 

आमचे गृहपाठ नेहमी अवघड इंग्लिशचे आणि किचकट गणितांचेच का असतात? 

हे दोनच विषय आयुष्यात सर्वकाही शिकवतात का? युरोप-अमेरिकेच्या सगळ्याचा मुलांना कुठे चांगले गणित येते, जपान-जर्मनीच्या मुलांना कुठे फाडफाड इंग्लिश बोलता येते, आफ्रिकेतील सगळ्याच मुलांना कुठे वयाच्या दहा बारा वर्षात कॉम्पुटरचे कोडिंग काय असते हे माहित होते. 


स्पर्धांची गरज आहे का? 

मग आमच्याच मुलांना हे सगळे लहान वयातच यायला हवे हा अट्टाहास का?


गृहपाठ नेहमी लेखनाचा आणि घोकंपट्टीचाच का असतो? 

तो आई वडिलांबरोबर आज्जी आजोबांबरोबर चर्चा करायचा का नसतो? 

वर्गातील चार मुलांना एखाद्या परीक्षेत कमी मार्क्स मिळाले तर शाळेच्या मुख्याध्यपकाला त्याचे का टेन्शन येते? 

ते का पालकांना बोलावून मुलांची तक्रार करतात? 


माझ्या शाळेची मुलं सगळ्याच विषयात, सगळ्याच खेळात, सगळ्याच अभ्यासेतर उपक्रमात मुलं इतर शाळेच्या पुढे असलीच पाहिजेत हा शाळांचा पण अट्टाहास का? आणि या अट्टहासातूनच बालमनावर गृहपाठाचे ओझे थोपवले जात आहे. 

याला शाळा जेवढ्या जबाबदार आहेत तेव्हढेच आजचे स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे पालक पण आहेत. 

शाळा आणि पालक या दोन्हीच्या संगनमताने हा गृहपाठाचा गुन्हा दररोज मुलांच्या माथी मारला जात आहे. 

एक दिवस गृहपाठ दिला नाही तर पालक अस्वस्थ होतायत, आसपासच्या दहा लोंकाना विचारून खात्री करून घेतायत की खरेच आज गृहपाठ नाही ना. 

आम्ही शालेय अभ्यासक्रमात नवनवीन प्रयोग करतोय, नवीन पॉलिसीज घेऊन येतोय, पण स्पर्धेचे काय? 


खरेच  या बालमानांना एव्हढ्याश्या लहान वयात या सगळ्या स्पर्धेची गरज आहे? 


माझे मुलं सर्वच विषयात सर्वच खेळता सर्वच कलेत सर्वगुणसंपन्न असले पाहिजे हा पालकांचा अट्टाहास आणि आमच्या शाळेची मुलं सर्वच क्षेत्रात यशस्वी झाली पाहिजेत हा शाळांचा अतिमहत्वाकांक्षीपणा या कोवळ्या बालमानांना जीवघेणी स्पर्धेत ढकलत आहेत. 

अजूनही वेळ गेली नाही, मूलभूत स्पर्धाविरहित सुधारणा करण्यासाठी ..     


डॉ. नानासाहेब थोरात 

वरिष्ठ शास्त्रज्ञ

मेडिकल सायन्स डिव्हिजन 

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंग्लंड

निकाल

  निकाल हल्लीचे दहावीचे निकाल पाहिल्यावर हसावं की रडावं, तेच कळेना झालं आहे. कारण.. चाळीस, पन्नास टक्क्यावाला विद्यार्थी आता शोधून सुद्धा सा...